श्री तुळजाभवानीचा महिमा अनेक संत, महात्म्यांनी गायला. स्वातंत्र्यवीरांची ती ऊर्जास्तोत्र आहे. आद्य शंकराचार्य तसेच अनेक संतांचा या तुळजापूर क्षेत्राला चरणस्पर्श झाला. तर अनेक राजपुरुष, रणधुरंदर भवानीचा आशीर्वाद आणि कृपेसाठी तिच्यासमोर झुकले, तिला शरण गेले.
या श्रीक्षेत्र तुळजापुरातील पुरातन, ऐतिहासिक स्थळांचा शोध घेतल्यास, तुळजापूर आणि भवानीदेवीचा क्षेत्रपाल 'श्री कालभैरव' याचे अनन्य साधारण महत्व तुळजापुरात आहे. भवानी मंदिराच्या दक्षिणेस बालाघाटाच्या कड्यावर हे कालभैरवाचे मंदिर आहे. तुळजाभवानी नंतर कालभैरवाच्या दर्शनाशिवाय भवानी दर्शन पूर्ण होत नाही असा पूर्वापार समज आहे. कालभैरवाच्या मंदिरातील मूर्ती त्याच्या नावाला आणि कीर्तीला शोभेल अशीच उग्र भयानक आहे. आणि त्याला शोभेल असाच 'मांस' आणि 'गांजा'चा नैवेद्य अर्पण केला जातो. प्रक्षाळपूजा झाल्यानंतर दररोज त्याला गांजाची चिलीम भरून दिली जाते. तो गांजा ओढतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. तो सर्पबाधानिवारक आहे. त्याच्या मंदिरात वावरणारे साप भक्तांना बाधत नाहीत असे मंदिराचे पुजारी ॲड. ओमकार मस्के सांगतात. त्यांना संतुष्ट करण्यासाठी प्रत्येक वर्षी अश्विन अमावस्येला मंदिरात 'भेंडोळी' हा विलक्षण विधी खेळला जातो.
![]() |
श्री काळभैरव - बाळभैरव (टोळभैरव), श्रीक्षेत्र तुळजापूर, जि. धाराशिव, महाराष्ट्र. Historical and Ancient places in Tuljapur, Dist. Dharashiv, Maharashtra.
![]() |
श्री काळभैरव - बाळभैरव (टोळभैरव) मंदिर, श्रीक्षेत्र तुळजापूर, जि. धाराशिव, महाराष्ट्र. Historical and Ancient places in Tuljapur, Dist. Dharashiv, Maharashtra. |
![]() |
| श्री काळभैरव - बाळभैरव (टोळभैरव) मंदिर, श्रीक्षेत्र तुळजापूर, महाराष्ट्र. |
भारतात फक्त श्रीक्षेत्र 'काशी' आणि 'दक्षिण काशी' म्हणून लौकिक असणाऱ्या तुळजापुरातच ही 'भेंडोळी' खेळली जाते. ही 'भेंडोळी' म्हणजे एक ज्वालायात्रा आहे. एका लांब मोठ्या लाकडाला केळ आणि इतर झाडांच्या फांद्या बांधून त्याला मध्यभागी कापड गुंडाळून पेटविले जाते. आणि साहसी तरुण त्याच्या दोन्ही बाजू पालखीसारख्या आडव्या खांद्यावर घेऊन वेगाने मागेपुढे करत मंदिराभोवती आणि आवारात मिरवणूक काढतात. त्यावेळी कालभैरवासोबत भवानीचाही जयजयकार केला जातो. श्रीजगदंबेच्या क्षेत्रीचा हा 'कोतवाल' ज्वालायात्रेच्या रूपाने वर्षातून एकदा आपली दाहकता दाखवून दबदबा राखताना दिसतो.
![]() |
| श्री कालभैरवाची 'भेंडोळी', श्रीक्षेत्र तुळजापूर.(फोटो सौजन्य - पुजारी ओमकार मस्के) |
![]() |
| श्री कालभैरवाची 'भेंडोळी', श्रीक्षेत्र तुळजापूर. (फोटो सौजन्य - पुजारी ओमकार मस्के) |
तुळजापूर क्षेत्राला अनेक संतांचा संबंध येऊनही त्यांचे 'मठ' इथे दिसत नाहीत. त्यापैकी शाक्त, कापालिक, नाथ आणि दसनामी साधना संप्रदायाच्या पाऊलखुणा मात्र तुळजापुरात आज दिसतात. त्यातील जे काही पाच-सहा जुने मठ आहेत, त्या मठाधीपतींना श्री तुळजाभवानीच्या नित्य उपासनेतील पूर्वापार चालत आलेले काही अधिकार आहेत. गरीबनाथ मठ, भारतीबाबा मठ, हमरोजीबुवा मठ, वाकोजीबुवा मठ यांचा इथे विशेष उल्लेख करावा लागेल. पण दुर्लक्ष झाल्यामुळे ते आता क्षीण झालेले दिसतात.
त्यापैकी नाथपंथांच्या परंपरेतील भवानी मंदिराच्या उत्तरेला जवळच 'गरीबनाथ मठ' आहे. सध्या त्याला 'दशावतारांचा मठ' म्हणूनही ओळखतात. या मठातील 'प्रकाशनाथ' नावाच्या मठाधिपतींनी बेंगलोरच्या शिल्पकाराकडून दशावतारांच्या मुर्त्या घडवून त्यांची मठात स्थापना केली. मठाचे मूळ संस्थापक 'गरीबनाथ' आणि त्यांच्या शिष्यांच्या मठात समाध्या दिसतात.
![]() |
| 'गरीबनाथ मठ', श्रीक्षेत्र तुळजापूर जि. धाराशिव, महाराष्ट्र. Historical and Ancient places in Tuljapur, Dist. Dharashiv, Maharashtra. |
![]() |
| मठपतींची 'समाधी', 'गरीबनाथ मठ', श्रीक्षेत्र तुळजापूर. महाराष्ट्र. |
![]() | |
|
![]() |
| 'कल्लोळ तीर्थ', श्री तुळजाभवानी मंदिर. |
या तीर्थात स्नान करताना गरीबनाथांच्या ओंजळीत लिंबू, नारळ आणि वेताची काठी या वस्तू आल्या. या तीनही वस्तू त्यांनी काशीत गंगेच्या पात्रात समर्पित केल्या होत्या. या अद्भुत अनुभवामुळे गरीबनाथांना देवीच्या उपदेशाचे रहस्य उमगले आणि त्यांनी देवीकडे क्षमायाचना केली. परंतु देवीने 'इथून पुढे तू आणि तुझ्या परंपरेतील मठपतींनी माझ्या दर्शनास येऊ नये. इतकेच नव्हे तर मठाचा उंबराही ओलांडू नये' असा शाप दिला. कोपलेल्या भवानीची गरीबनाथांनी करुणा भाकल्यानंतर जगदंबेने 'वर्षातून एकदाच अश्विनी अमावस्येच्या मध्यरात्री मठपतींनी मठाबाहेर पडावे आणि दर्शन घ्यावे' असा ऊ:शाप दिला.
![]() |
| 'कल्लोळ तीर्थ', श्री तुळजाभवानी मंदिर.श्रीक्षेत्र तुळजापूर जि. धाराशिव, महाराष्ट्र. Historical and Ancient places in Tuljapur, Dist. Dharashiv, Maharashtra. |
आजतागायत भवानीची ही आज्ञा या मठातील मठपती फार कठोरपणे पाळतात. अश्विनी अमावस्येच्या मध्यरात्री मठपती भवानी मंदिरात येतात आणि त्या जगतमातेची यथासांग पूजा करून तिला महावस्त्र नेसवितात.
![]() |
| 'गरीबनाथ मठ', श्रीक्षेत्र तुळजापूर जि. धाराशिव, महाराष्ट्र. |
या मठाला सातारा आणि करवीर या दोन्ही राज्यांचे छत्रपती तसेच पेशव्यांच्या काळापासून जमिनी इनाम दिल्या आहेत. मठपतींच्या वतीने त्या कसल्या जातात. भवानीच्या शाप, उ:षापाचा प्रभाव सध्याच्या मठपतींच्या आचार विचारांवर आहे. नाथपंथांचाही त्यांना रास्त अभिमान आहे. भवानीच्या निषेध आज्ञेचे कारण अगदी सहज स्वीकारून मठातले बंदिस्त जीवन ते शतकानूशतके व्यतीत करीत आहेत. नाथपंतांच्या उदयकाळापासून 'हिंगलाज' देवीची सुंदर सिंदूरचर्चित मूर्ती तांदळा रूपात या मठात विराजमान आहे.
![]() |
| 'श्री हिंगलाज माता', गरीबनाथ मठ, श्रीक्षेत्र तुळजापूर जि. धाराशिव, महाराष्ट्र. Historical and Ancient places in Tuljapur, Dist. Dharashiv, Maharashtra. |
![]() |
| रणछोडबुवा भारती आणि श्री तुळजाभवानीचा 'सारीपाट', भारतीबुवा मठ, तुळजापूर. |
![]() |
| 'भारतीबुवा मठ', श्रीक्षेत्र तुळजापूर जि.धाराशिव, महाराष्ट्र. Historical and Ancient places in Tuljapur, Dist. Dharashiv, Maharashtra. |
![]() |
| 'भारतीबुवा मठ', श्रीक्षेत्र तुळजापूर जि.धाराशिव, महाराष्ट्र. Historical and Ancient places in Tuljapur, Dist. Dharashiv, Maharashtra. |
![]() |
| 'भारतीबुवा मठ', श्रीक्षेत्र तुळजापूर जि.धाराशिव, महाराष्ट्र. Historical and Ancient places in Tuljapur, Dist. Dharashiv, Maharashtra. |
या भारतीबुवांच्या मठात त्याकाळची पुरातन 'बारव' (विहीर) दिसते. या विहिरीचा संबंध तुळजाभवानीला प्रतिवर्षी दसऱ्यात नवीन पलंग आणि पालखी पाठवणारे अहमदनगरचे 'जनकोजी देवकर' यांच्याशी येतो.
जनकोजी देवकर हे नगर (अहमदनगर) जिल्ह्यातील 'भिंगारी' गावचे तेली समाजातील भवानीभक्त. अहमदनगरच्या निजामशाहीत सुलतानाने भिंगारीचे 'बुऱ्हाननगर' असे नामकरण केले. जनकोजींच्या दारी आलेल्या एका अनाथ मुलीचे त्यांनी संगोपन करून पोटच्या लेकीप्रमाणे वाढविले. वयात येतात या मुलीच्या रूपसौंदर्याची कीर्ती वासनांध बुऱ्हाणशहाच्या कानावर गेली. स्वतःच्या मुलीसमान असलेल्या या मुलीवर त्याने बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुलीने त्याला शाप दिला की, 'लवकरच तुला पापाचे फळ भोगावे लागेल. तुझे हे बुऱ्हाणनगरातील वैभव नष्ट होईल'. अल्पावधीतच तिचा शाप खरा ठरला.
जनकोजी मात्र या कन्येच्या सानिध्यात श्रीमंत झाले. आपल्या कष्टातून मिळवलेली सर्व संपत्ती ते दानधर्मात खर्च करू लागले. एके दिवशी ते कन्येसह तुळजापूरक्षेत्री भवानी दर्शनाला निघाले. 'आष्टी' इथे आल्यावर या कन्यने आपले दैवी रूप प्रकट केले आणि अंतर्धान पावली. जनकोजी तुळजापुरात पोहोचले पण आतापर्यंत त्यांच्या घरी राहिलेल्या कन्येच्या रूपात भवानीच्या दर्शनासाठी ते व्याकुळ झाले. तुळजापुरातील भारतीबुवांच्या मठातील या विहिरीकाठावर उभा राहून त्यांनी भवानीला हाक दिली की, 'तू मला पुन्हा दर्शन दिले नाहीस तर मी या विहिरीत उडी घेऊन प्राणत्याग करेन'. त्यांची निर्वाणीची हाक ऐकून जगदंबा प्रकट झाली आणि सांगितले की 'मी पुन्हा परतणार नाही, पण दरवर्षी तू मला पालखी आणि पलंग तुळजापूरला पाठवत जा'. जनकोजींनी पुढे हा क्रम निष्ठेने पाळला. एकदा तुळजापुरला येताना वार्धक्यामुळे जनकोजींचे 'आष्टी'जवळ निधन झाले. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचे शव तुळजापुरात आणून भवानीच्या क्षेत्रातच अंत्यसंस्कार करण्यात आला. सध्या तुळजापुरातील शुक्रवार पेठेत जनकोजींची समाधी आहे. आजही जनकोजींचे वंशज नगरहून पालखी आणि पलंग श्रद्धेने पाठवितात. आणि ज्या विहिरीवर (बारव) जनकोजी उभा राहून कन्येच्या प्रेमापोटी भवानीला आर्त साद घातली, ती विहीर भारतीबुवांच्या मठात आजही अस्तित्वात आहे. इतकेच की सध्या तिचे महत्त्व विसरलेले किंवा पूर्ण दुर्लक्षित झाले आहे.
![]() |
| 'बारव' (विहीर) - भारतीबुवा मठ. श्रीक्षेत्र तुळजापूर जि.धाराशिव, महाराष्ट्र. Historical and Ancient places in Tuljapur, Dist. Dharashiv, Maharashtra. |
![]() |
| 'भारतीबुवा मठ', श्रीक्षेत्र तुळजापूर जि.धाराशिव, महाराष्ट्र. Historical and Ancient places in Tuljapur, Dist. Dharashiv, Maharashtra. |
या मठांव्यतिरिक्त भवानी मंदिराच्या नैऋत्येकडे 'वाकोजीबुवांचा' जुना मठ आहे. भवानी मंदिराची चावी या मठाच्या अधिपतींकडे असते. मठाची गादी ब्रह्मचारी पुरुषाकडे आहे. भवानी मंदिरातील दिवाबत्ती आणि मंदिर रोषणाईची व्यवस्था तसेच सकाळची चरणतीर्थ पूजा व रात्री प्रक्षालनपूजा ही नित्य उपासनेतील कामे वाकोजीबुवांच्या मठाकडे आहेत. या सेवेसाठी मठास सरकारकडून ठराविक रक्कम मिळते. या मठात भवानीची सुंदर मूर्ती आहे.
![]() |
| श्री तुळजाभवानी मंदिर. Historical and Ancient places in Tuljapur. |
'हमरोजीबुवां'च्या मठाकडे देवीचा जमादारखाना सांभाळण्याचे अत्यंत जबाबदारीचे आणि जोखमीचे काम आहे. देवीच्या जमादारखान्यात तिच्या रत्नजडित सुवर्णाअलंकारांचा समावेश आहे. त्यामुळे या मठाचे प्रमुख देवीस अलंकार चढवताना आणि ते विशिष्ट वेळी उतरवताना जातीने उभे राहतात.
या मठांशिवाय गावाच्या उत्तरेला 'अरणबुवांचा' मठ आणि गावाच्या दक्षिण सीमेवर 'सोमवार गिरजीं'चा मठ आहे.
सर्व तीर्थक्षेत्रात असतात तशी तुळजापुरातही बरीच 'तीर्थे' (पवित्र जळे) आहेत काही कुंडांच्या स्वरूपात, काही विहिरी तर काही वाहती आहेत. गावात बिडकर तलाव, कालभैरव तलाव, रामदरा तलाव तसेच अहिल्याबाईंची विहीर, कोटाची विहीर, पिराची विहीर, भगवतीबाईंची विहीर अशा बऱ्याच विहीरी आहेत.
भगवतीबाई ही एक कर्तबगार स्त्री, कदम पाटील भोपे यांच्या घराण्यातील. 'भोपे' म्हणजे भवानीदेवीचे 'पुजारीपण' सांभाळणारे. कोल्हापुरचे भोपेराव घराणे हे भगवतीबाईंचे मूळ घराणे. आम्ही चौकशी करून शोध घेतला तेव्हा 'श्रीछत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्ट कोल्हापूर' यांच्या अखत्यारीतील या जागेत छ. राजाराम महाराजांच्या (महाराणी ताराबाईंचे नातू) कालखंडात बांधलेला इथे वाडा आहे. सध्या त्याची पडझड झाली आहे. वाड्याची दगडी कमान जी शेवटची आठवण जागेवर शिल्लक दिसते, तीही शेवटची घटका मोजताना दिसते. या वाड्याचे दगडही स्थानिकांनी जाग्यावर ठेवलेले दिसत नाहीत. वाड्यात एका दगडी चौथर्यावर त्यावेळची श्रीभवानीची अतिसुंदर मूर्ती आहे.
![]() |
| 'श्रीछत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्ट कोल्हापूर', श्रीक्षेत्र तुळजापूर. |
![]() |
| छ. राजाराम महाराज कालखंडातील वाडा, श्रीक्षेत्र तुळजापूर. जि.धाराशिव, महाराष्ट्र. |
![]() |
| वाड्यातील 'श्री भवानी मंदिर'. श्रीक्षेत्र तुळजापूर, महाराष्ट्र. |
कोल्हापूरच्या महाराणी ताराबाईंचे नातू 'रामराजे' हे भाऊबंदकीच्या कारस्थानात बळी पडू नये म्हणून ताराबाईंनी त्यांना जन्मापासूनच गुप्तपणे सुरक्षित ठिकाणी ठेवले. ते प्रथम विशाळगडावर अमात्यपंतांच्या नजरेखाली आणि नंतर भगवतीबाईंच्या या घरी तुळजापुरात 'भोप्यांचे' बाळ म्हणूनच वाढले. हेच अल्पवयीन रामराजे पुढे शाहू छत्रपतींच्या निर्णयानंतर साताऱ्याच्या गादीवर नवे छत्रपती म्हणून आरुढ झाले. पुढे करवीरकर छत्रपतींनी कृतज्ञतापूर्वक भगवतीबाईंच्या वंशजांना कोल्हापुरात आणून मोठे केले. आमच्या भेटी दरम्यान तुळजापूर गावातीलच एक कुटुंब त्यांच्या घराची दुरुस्ती सुरू असल्याने पडलेल्या या वाड्यात राहायला आलेले दिसले.
![]() |
| छ. राजाराम महाराज कालखंडातील वाडा, श्रीक्षेत्र तुळजापूर. जि.धाराशिव, महाराष्ट्र. Historical and Ancient places in Tuljapur, Dist. Dharashiv, Maharashtra. |
वाड्याच्या उजवीकडे कोल्हापूर संस्थानाच्या या कर्तबगार भगवतीबाईंनी तुळजापुरात येणाऱ्या भाविकांची तहान भागविण्यासाठी सुंदर विहीर बांधली. या विहिरीच्या काठावर देवी भगवतीचे पुरातन छोटे मंदिर दिसते. मंदिरात दिवाबत्ती केलेली दिसते. पुजाऱ्यांच्या (भोपे) घरांनी गराडा घातलेल्या या विहिरीत उजवा वळसा मारून उतरता येते. घडीव पायऱ्यांवरून वळसा मारताना त्यावेळीची सुघड दगडी कमान, कमानीच्या दोन्ही बाजूस देवड्या आणि उजव्या देवडीत श्री गणेशाची भान हरपणारी सुंदर मूर्ती दिसते. विहिरीच्या काठावर रेखीव 'गोमूख' आणि त्यावेळची 'रहाट' व्यवस्थाही दिसते. विहीर सध्या कचरा, गाळाने भरली आहे आणि त्यांच्या जोडीला दुर्गंधी आहेच. ही पुरातन विहीर आणि वाडा गावाच्या 'कमानी वेशी'पासून भवानी मंदिराकडे जाणाऱ्या 'महाद्वार' रस्त्याच्या उजवीकडे आहेत.
![]() |
| 'भगवती विहिरी'त समोर कमानीतून उतरणाऱ्या पायऱ्या. श्रीक्षेत्र तुळजापूर. जि.धाराशिव, महाराष्ट्र. Historical and Ancient places in Tuljapur, Dist. Dharashiv, Maharashtra. |
![]() |
| भगवती विहिरीच्या कमानीतील 'श्री गणेश'. श्रीक्षेत्र तुळजापूर. जि.धाराशिव, महाराष्ट्र. Historical and Ancient places in Tuljapur, Dist. Dharashiv, Maharashtra. |
![]() |
| 'भगवती विहिरी'त उतरणाऱ्या पायऱ्या. श्रीक्षेत्र तुळजापूर. जि.धाराशिव, महाराष्ट्र. Historical and Ancient places in Tuljapur, Dist. Dharashiv, Maharashtra. |
तुळजापूर गावाच्या दक्षिणेस बालाघाट डोंगराच्या कड्यावर 'पापनाशी तीर्थ' आहे. अहिल्याची वंचना करून, कपटाने तिचे शील हरण करणाऱ्या इंद्राची गौतम ऋषींच्या शापातून मुक्तता झाली ती पापनाशी तीर्थात स्नान केल्यामुळे.
'मातंगी कुंड' हे मातंगी देवीशी संबंधित आहे. पूर्वास्पृश्य समाजातील भाविकांप्रमाणे सवर्ण भाविकही नवरात्रात या तीर्थात स्नान करतात.
आकाराने मोठे असलेले 'मंकावती तीर्थ' हे भवानी मंदिराच्या पूर्वेकडे आहे. 'विष्णूतीर्थ' या नावाने स्थलपुराणात याचा उल्लेख आहे. 'महिकावती' किंवा 'कोट्टमहिका' या मातृदेवतेशी त्याचा संबंध येतो. या तीर्थाला तीन बाजूंनी प्रवेशद्वारे असून या तीर्थात भवानी आपल्या ६४ योगिनींच्या परिवारासह जलविहार करते अशी श्रद्धा आहे. आम्ही भेट दिली त्यावेळी हे तीर्थ बंद ठेवून त्याची अंतर्गत दुरुस्ती सुरू होती.
'नागझरी तीर्थ' हे भवानी मंदिराच्या उत्तरेस कालभैरवाच्या वाटेवर दक्षिण बाजूस डोंगरदरीत आहे. अहिरावणाने वासूकीचे राज्य हिरावून घेतल्यानंतर त्या नागराजाने राज्याच्या पुनर्प्राप्तीसाठी जेथे तप केले आणि त्याच्या तपाचे फळ त्याला मिळाले ते हे स्थान. या तीर्थाचीही महती स्थलपुराणात असल्यामुळे मनोकामना पूर्तीसाठी भाविक या तीर्थात स्नान करतात. नारायण नागबळी असे विधीही इथे होतात.
यानंतर आम्ही अहिल्यादेवींनी बांधलेल्या विहिरीचा शोध घेतला. मल्हारराव होळकरांची सून, पुण्यश्लोक माता अहिल्याबाईंनी मल्हाररावांच्या त्यावेळच्या पंधरा सोळा कोटी रुपयांच्या शिल्लकीतून प्रचंड 'धर्म' केला. हे द्रव्य केवळ ब्राह्मणभोजन आणि साधुसंत फकीरांना न वाटता, त्यांनी भारतवर्षात हिंदू धर्मांच्या पवित्र ठिकाणी मोठमोठ्या वास्तू उभारल्या. गरीब यात्रेकरूंसाठी अन्नपाण्याची सोय लावून दिली. काशी, प्रयाग, गया, हरिद्वार, आयोध्या, रामेश्वर इत्यादी ठिकाणी त्यांनी बांधलेले घाट व मंदिरे प्रसिद्ध आहेतच. तुळजापुरातही 'कमानी वेशी'वर डाव्या बाजूला अहिल्याबाईंनी बांधलेली ही मोठी विहीर त्यांच्या विवेकी धर्मबुद्धीचा आणि उदारतेचा पुरावा देते.
![]() |
| 'अहिल्यादेवींची विहीर'. श्रीक्षेत्र तुळजापूर. जि.धाराशिव, महाराष्ट्र. |
चौकशी करत या ऐतिहासिक विहिरीजवळ पोहोचलो आणि तीची अवस्था बघून डोळ्यांवर विश्वास बसला नाही. ही पुरातन विहीर गावच्या मुख्य 'कमानी वेशी'वर असून विहिरीच्या तीनही बाजूंनी स्थानिक इमारतींनी गराडा घातला आहे. विहिरीची रस्त्याकडील चौथी बाजू लोखंडी जाळीदार दरवाजाने कुलूपबंद आहे. या दरवाजाच्या तोंडावर अतिक्रमण केलेली आडवी पानाची टपरी'ही दिसते. दरवाजातून आत डोकावून पाहिल्यास विहिरीत प्रचंड वाढलेल्या झुडपातून विहिरीच्या कातळ भिंती, सुंदर दगडी कमान, घडीव पायऱ्या दिसतात. गाळ आणि विहिरीत टाकलेल्या कचऱ्यातून त्या शोधाव्या लागतात. अहिल्याबाईंच्या आगळ्या भक्तीचा आईभवानीलाही अभिमान वाटावा असा त्यांनी दिलेला वारसा आज सांभाळताही येईना याची खंत वाटली.
![]() |
| 'अहिल्यादेवींची विहीर'. श्रीक्षेत्र तुळजापूर. जि.धाराशिव, महाराष्ट्र. Historical and Ancient places in Tuljapur, Dist. Dharashiv, Maharashtra. |
![]() |
| 'अहिल्यादेवींची विहीर'. श्रीक्षेत्र तुळजापूर. जि.धाराशिव, महाराष्ट्र. |
इथल्या विहिरी, तलावांची आणि तीर्थप्रतिष्ठा लाभलेल्या कुंडांची अवस्था मुळात स्वच्छ, सुंदर असायला हवी. पण भवानीमंदिरातील कल्लोळतीर्थ, गोमुखतीर्थ आणि मंकावती तीर्थाव्यतिरिक्त इतर कुंडांकडे स्थानिक नगरविकास तसेच पुरातत्व खात्याने अगदीच दुर्लक्ष केलेले दिसते. या व्यतिरिक्त काही ऐतिहासिक वास्तू तसेच पुरातन परिवार देवतांच्या जागा, ज्या भवानीशी संबंधित आहेत आता त्यांचे महत्त्व लुप्त होऊन नाहीशा होत चालल्या आहेत..
|| श्रीकृष्णार्पणमस्तू ||
(श्री तुळजाभवानी मंदिर, भवानीचा प्राचीन इतिहास आणि भवानीचा गोंधळ याबद्दल सविस्तर माहिती sahyadri300.blogspot.com/2025/12/shri-tuljabhavani-tuljapur-dist.html या लिंकवर सविस्तर दिली आहे.)
येथे - जयवंत जाधव








































































