Monday, 29 December 2025

श्रीक्षेत्र तुळजापुरातील ऐतिहासिक आणि पुरातन स्थळे, जि. धाराशिव, महाराष्ट्र. - Historical and Ancient places in Tuljapur, Dist. Dharashiv, Maharashtra.

                        श्री तुळजाभवानीचा महिमा अनेक संत, महात्म्यांनी गायला. स्वातंत्र्यवीरांची ती ऊर्जास्तोत्र आहे. आद्य शंकराचार्य तसेच अनेक संतांचा या तुळजापूर क्षेत्राला चरणस्पर्श झाला. तर अनेक राजपुरुष, रणधुरंदर भवानीचा आशीर्वाद आणि कृपेसाठी तिच्यासमोर झुकले, तिला शरण गेले. 

                      या श्रीक्षेत्र तुळजापुरातील पुरातन, ऐतिहासिक स्थळांचा शोध घेतल्यास, तुळजापूर आणि भवानीदेवीचा क्षेत्रपाल 'श्री कालभैरव' याचे अनन्य साधारण महत्व तुळजापुरात आहे. भवानी मंदिराच्या दक्षिणेस बालाघाटाच्या कड्यावर हे कालभैरवाचे मंदिर आहे. तुळजाभवानी नंतर कालभैरवाच्या दर्शनाशिवाय भवानी दर्शन पूर्ण होत नाही असा पूर्वापार समज आहे. कालभैरवाच्या मंदिरातील मूर्ती त्याच्या नावाला आणि कीर्तीला शोभेल अशीच उग्र भयानक आहे. आणि त्याला शोभेल असाच 'मांस' आणि 'गांजा'चा नैवेद्य अर्पण केला जातो. प्रक्षाळपूजा झाल्यानंतर दररोज त्याला गांजाची चिलीम भरून दिली जाते. तो गांजा ओढतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. तो सर्पबाधानिवारक आहे. त्याच्या मंदिरात वावरणारे साप भक्तांना बाधत नाहीत असे मंदिराचे पुजारी ॲड. ओमकार मस्के सांगतात. त्यांना संतुष्ट करण्यासाठी प्रत्येक वर्षी अश्विन अमावस्येला मंदिरात 'भेंडोळी' हा विलक्षण विधी खेळला जातो. 

श्री काळभैरव - बाळभैरव (टोळभैरव), श्रीक्षेत्र तुळजापूर, जि. धाराशिव, महाराष्ट्र. Historical and Ancient places in Tuljapur, Dist. Dharashiv, Maharashtra.


श्री काळभैरव - बाळभैरव (टोळभैरव) मंदिर, श्रीक्षेत्र तुळजापूर, जि. धाराशिव, महाराष्ट्र. Historical and Ancient places in Tuljapur, Dist. Dharashiv, Maharashtra.



श्री काळभैरव - बाळभैरव (टोळभैरव) मंदिर, श्रीक्षेत्र तुळजापूर, महाराष्ट्र.

                                 भारतात फक्त श्रीक्षेत्र 'काशी' आणि 'दक्षिण काशी' म्हणून लौकिक असणाऱ्या तुळजापुरातच ही 'भेंडोळी' खेळली जाते. ही 'भेंडोळी' म्हणजे एक ज्वालायात्रा आहे. एका लांब मोठ्या लाकडाला केळ आणि इतर झाडांच्या फांद्या बांधून त्याला मध्यभागी कापड गुंडाळून पेटविले जाते. आणि साहसी तरुण त्याच्या दोन्ही बाजू पालखीसारख्या आडव्या खांद्यावर घेऊन वेगाने मागेपुढे करत मंदिराभोवती आणि आवारात मिरवणूक काढतात. त्यावेळी कालभैरवासोबत भवानीचाही जयजयकार केला जातो. श्रीजगदंबेच्या क्षेत्रीचा हा 'कोतवाल' ज्वालायात्रेच्या रूपाने वर्षातून एकदा आपली दाहकता दाखवून दबदबा राखताना दिसतो.

श्री कालभैरवाची 'भेंडोळी', श्रीक्षेत्र तुळजापूर.(फोटो सौजन्य - पुजारी ओमकार मस्के)
 
श्री कालभैरवाची 'भेंडोळी', श्रीक्षेत्र तुळजापूर. (फोटो सौजन्य - पुजारी ओमकार मस्के)

                     तुळजापूर क्षेत्राला अनेक संतांचा संबंध येऊनही त्यांचे 'मठ' इथे दिसत नाहीत. त्यापैकी शाक्त, कापालिक, नाथ आणि दसनामी साधना संप्रदायाच्या पाऊलखुणा मात्र तुळजापुरात आज दिसतात. त्यातील जे काही पाच-सहा जुने मठ आहेत, त्या मठाधीपतींना श्री तुळजाभवानीच्या नित्य उपासनेतील पूर्वापार चालत आलेले काही अधिकार आहेत. गरीबनाथ मठ, भारतीबाबा मठ, हमरोजीबुवा मठ, वाकोजीबुवा मठ यांचा इथे विशेष उल्लेख करावा लागेल. पण दुर्लक्ष झाल्यामुळे ते आता क्षीण झालेले दिसतात.

                        त्यापैकी नाथपंथांच्या परंपरेतील भवानी मंदिराच्या उत्तरेला जवळच 'गरीबनाथ मठ' आहे. सध्या त्याला 'दशावतारांचा मठ' म्हणूनही ओळखतात. या मठातील 'प्रकाशनाथ' नावाच्या मठाधिपतींनी बेंगलोरच्या शिल्पकाराकडून दशावतारांच्या मुर्त्या घडवून त्यांची मठात स्थापना केली. मठाचे मूळ संस्थापक 'गरीबनाथ' आणि त्यांच्या शिष्यांच्या मठात समाध्या दिसतात.   

'गरीबनाथ मठ', श्रीक्षेत्र तुळजापूर जि. धाराशिव, महाराष्ट्र. Historical and Ancient places in Tuljapur, Dist. Dharashiv, Maharashtra.
मठपतींची 'समाधी', 'गरीबनाथ मठ', श्रीक्षेत्र तुळजापूर. महाराष्ट्र. 
 
'गरीबनाथ मठ', श्रीक्षेत्र तुळजापूर. महाराष्ट्र.

                           या मठातील मठाधिपतींना मठाबाहेर पडता येत नाही. तसेच भवानीचे नित्य दर्शनही घेता येत नाही. हा दंडक मठसंस्थापक गरीबनाथांच्या काळापासून पाळला जातो. या दंडकामागे एक मिथक सांगितले जाते की, गरीबनाथ एकदा काशीयात्रेस निघाले असता त्यांनी आपला संकल्प भवानीला सांगितला. तेव्हा भवानीने त्यांना यात्रेसाठी अनुज्ञा दिली नाही. 'सारी तीर्थे इथेच या गोमुखतीर्थातच उपस्थित आहेत' असे आग्रहपूर्वक सांगून जगदंबेने त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु गरीबनाथांनी देवीचा आदेश न पाळता काशीयात्रेला गेले. काशीहून परतताना मात्र त्यांच्या मागे 'गंगा' निघाली. गंगेचा भूमिगत खळखळाट त्यांनी तुळजापुरात पोहोचल्यावर मागे वळून पाहिला आणि गंगा थांबली. आणि तिथेच कल्लोळ तीर्थाच्या रूपात वाहू लागली. भरत खंडातील सर्व पवित्र जलांनी भवानीचे चरणसानिध्य अनुभवण्यासाठी येथे 'कल्लोळ' केला. म्हणून हे 'कल्लोळतीर्थ' नावाने प्रसिद्ध पावले. 

  

'कल्लोळ तीर्थ', श्री तुळजाभवानी मंदिर. 


                          या तीर्थात स्नान करताना गरीबनाथांच्या ओंजळीत लिंबू, नारळ आणि वेताची काठी या वस्तू आल्या. या तीनही वस्तू त्यांनी काशीत गंगेच्या पात्रात समर्पित केल्या होत्या. या अद्भुत अनुभवामुळे गरीबनाथांना देवीच्या उपदेशाचे रहस्य उमगले आणि त्यांनी देवीकडे क्षमायाचना केली. परंतु देवीने 'इथून पुढे तू आणि तुझ्या परंपरेतील मठपतींनी माझ्या दर्शनास येऊ नये. इतकेच नव्हे तर मठाचा उंबराही ओलांडू नये' असा शाप दिला. कोपलेल्या भवानीची गरीबनाथांनी करुणा भाकल्यानंतर जगदंबेने 'वर्षातून एकदाच अश्विनी अमावस्येच्या मध्यरात्री मठपतींनी मठाबाहेर पडावे आणि दर्शन घ्यावे' असा ऊ:शाप दिला.  

'कल्लोळ तीर्थ', श्री तुळजाभवानी मंदिर.श्रीक्षेत्र तुळजापूर जि. धाराशिव, महाराष्ट्र. Historical and Ancient places in Tuljapur, Dist. Dharashiv, Maharashtra.

                      आजतागायत भवानीची ही आज्ञा या मठातील मठपती फार कठोरपणे पाळतात. अश्विनी अमावस्येच्या मध्यरात्री मठपती भवानी मंदिरात येतात आणि त्या जगतमातेची यथासांग पूजा करून तिला महावस्त्र नेसवितात.


 'गरीबनाथ मठ', श्रीक्षेत्र तुळजापूर जि. धाराशिव, महाराष्ट्र.

                           या मठाला सातारा आणि करवीर या दोन्ही राज्यांचे छत्रपती तसेच पेशव्यांच्या काळापासून जमिनी इनाम दिल्या आहेत. मठपतींच्या वतीने त्या कसल्या जातात. भवानीच्या शाप, उ:षापाचा प्रभाव सध्याच्या मठपतींच्या आचार विचारांवर आहे. नाथपंथांचाही त्यांना रास्त अभिमान आहे. भवानीच्या निषेध आज्ञेचे कारण अगदी सहज स्वीकारून मठातले बंदिस्त जीवन ते शतकानूशतके व्यतीत करीत आहेत. नाथपंतांच्या उदयकाळापासून 'हिंगलाज' देवीची सुंदर सिंदूरचर्चित मूर्ती तांदळा रूपात या मठात विराजमान आहे.   

'श्री हिंगलाज माता', गरीबनाथ मठ, श्रीक्षेत्र तुळजापूर जि. धाराशिव, महाराष्ट्र. Historical and Ancient places in Tuljapur, Dist. Dharashiv, Maharashtra.

                            नेपाळचा राजा 'जयप्रकाश मल्ल' हा श्रीतुळजाभवानी बरोबर सारीपाट खेळत असे अशी कथा सांगितली जाते. हेच मिथक खुद्द तुळजापुरातही भवानीच्या मूळ ठाण्यातही ऐकण्यास मिळते. तुळजापुरातील अनेक मठांपैकी 'भारतीबुवांचा' मठ प्रसिद्ध आहे. या मठाची स्थापना 'रणछोडबुवा भारती' या सत्पुरुषाने केली. मठाच्या गादीवर आजवर बरेच महंत होऊन गेले. भवानी मंदिरापासून पश्चिमेकडे (सोलापूर - धाराशिव हायवेच्या डाव्या बाजूस लागूनच) एक किमी अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी आणि आता 'शिंदफळ' गावाच्या हद्दीत हा भारतीबुवांचा मठ आहे. मठाचे हे संस्थापक तपस्वी भवानीभक्त होते. साक्षात भवानी रोज रात्री त्यांच्याबरोबर सारीपाठ खेळत असे सांगितले जाते. सध्या या मठात भारतीबुवांची सुंदर समाधी आणि बाजूला भवानीचे देवालय बांधलेले आहे. मठात भवानीमाता आणि भारतीबुवा (रणछोडबुवा) यांचा 'सारीपाट', त्यांच्या बैठकीची 'आसणे' मूळ रूपात (Original) दिसतात.
रणछोडबुवा भारती आणि श्री तुळजाभवानीचा 'सारीपाट', भारतीबुवा मठ, तुळजापूर.

 

'भारतीबुवा मठ',  श्रीक्षेत्र तुळजापूर जि.धाराशिव, महाराष्ट्र. Historical and Ancient places in Tuljapur, Dist. Dharashiv, Maharashtra.

'भारतीबुवा मठ',  श्रीक्षेत्र तुळजापूर जि.धाराशिव, महाराष्ट्र. Historical and Ancient places in Tuljapur, Dist. Dharashiv, Maharashtra.

'भारतीबुवा मठ',  श्रीक्षेत्र तुळजापूर जि.धाराशिव, महाराष्ट्र. Historical and Ancient places in Tuljapur, Dist. Dharashiv, Maharashtra.

                              या भारतीबुवांच्या मठात त्याकाळची पुरातन 'बारव' (विहीर) दिसते. या विहिरीचा संबंध तुळजाभवानीला प्रतिवर्षी दसऱ्यात नवीन पलंग आणि पालखी पाठवणारे अहमदनगरचे 'जनकोजी देवकर' यांच्याशी येतो. 

                           जनकोजी देवकर हे नगर (अहमदनगर) जिल्ह्यातील 'भिंगारी' गावचे तेली समाजातील भवानीभक्त. अहमदनगरच्या निजामशाहीत सुलतानाने भिंगारीचे 'बुऱ्हाननगर' असे नामकरण केले. जनकोजींच्या दारी आलेल्या एका अनाथ मुलीचे त्यांनी संगोपन करून पोटच्या लेकीप्रमाणे वाढविले. वयात येतात या मुलीच्या रूपसौंदर्याची कीर्ती वासनांध बुऱ्हाणशहाच्या कानावर गेली. स्वतःच्या मुलीसमान असलेल्या या मुलीवर त्याने बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुलीने त्याला शाप दिला की, 'लवकरच तुला पापाचे फळ भोगावे लागेल. तुझे हे बुऱ्हाणनगरातील वैभव नष्ट होईल'. अल्पावधीतच तिचा शाप खरा ठरला. 

                           जनकोजी मात्र या कन्येच्या सानिध्यात श्रीमंत झाले. आपल्या कष्टातून मिळवलेली सर्व संपत्ती ते दानधर्मात खर्च करू लागले. एके दिवशी ते कन्येसह तुळजापूरक्षेत्री भवानी दर्शनाला निघाले. 'आष्टी' इथे आल्यावर या कन्यने आपले दैवी रूप प्रकट केले आणि अंतर्धान पावली. जनकोजी तुळजापुरात पोहोचले पण आतापर्यंत त्यांच्या घरी राहिलेल्या कन्येच्या रूपात भवानीच्या दर्शनासाठी ते व्याकुळ झाले. तुळजापुरातील भारतीबुवांच्या मठातील या विहिरीकाठावर उभा राहून त्यांनी भवानीला हाक दिली की, 'तू मला पुन्हा दर्शन दिले नाहीस तर मी या विहिरीत उडी घेऊन प्राणत्याग करेन'. त्यांची निर्वाणीची हाक ऐकून जगदंबा प्रकट झाली आणि सांगितले की 'मी पुन्हा परतणार नाही, पण दरवर्षी तू मला पालखी आणि पलंग तुळजापूरला पाठवत जा'. जनकोजींनी पुढे हा क्रम निष्ठेने पाळला. एकदा तुळजापुरला येताना वार्धक्यामुळे जनकोजींचे 'आष्टी'जवळ निधन झाले. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचे शव तुळजापुरात आणून भवानीच्या क्षेत्रातच अंत्यसंस्कार करण्यात आला. सध्या तुळजापुरातील शुक्रवार पेठेत जनकोजींची समाधी आहे. आजही जनकोजींचे वंशज नगरहून पालखी आणि पलंग श्रद्धेने पाठवितात. आणि ज्या विहिरीवर (बारव) जनकोजी उभा राहून कन्येच्या प्रेमापोटी भवानीला आर्त साद घातली, ती विहीर भारतीबुवांच्या मठात आजही अस्तित्वात आहे. इतकेच की सध्या तिचे महत्त्व विसरलेले किंवा पूर्ण दुर्लक्षित झाले आहे.   

'बारव' (विहीर) - भारतीबुवा मठ. श्रीक्षेत्र तुळजापूर जि.धाराशिव, महाराष्ट्र. Historical and Ancient places in Tuljapur, Dist. Dharashiv, Maharashtra.

'भारतीबुवा मठ',  श्रीक्षेत्र तुळजापूर जि.धाराशिव, महाराष्ट्र. Historical and Ancient places in Tuljapur, Dist. Dharashiv, Maharashtra.

                              या मठांव्यतिरिक्त भवानी मंदिराच्या नैऋत्येकडे 'वाकोजीबुवांचा' जुना मठ आहे. भवानी मंदिराची चावी या मठाच्या अधिपतींकडे असते. मठाची गादी ब्रह्मचारी पुरुषाकडे आहे. भवानी मंदिरातील दिवाबत्ती आणि मंदिर रोषणाईची व्यवस्था तसेच सकाळची चरणतीर्थ पूजा व रात्री प्रक्षालनपूजा ही नित्य उपासनेतील कामे वाकोजीबुवांच्या मठाकडे आहेत. या सेवेसाठी मठास सरकारकडून ठराविक रक्कम मिळते. या मठात भवानीची सुंदर मूर्ती आहे.  

श्री तुळजाभवानी मंदिर. Historical and Ancient places in Tuljapur.

                    'हमरोजीबुवां'च्या मठाकडे देवीचा जमादारखाना सांभाळण्याचे अत्यंत जबाबदारीचे आणि जोखमीचे काम आहे. देवीच्या जमादारखान्यात तिच्या रत्नजडित सुवर्णाअलंकारांचा समावेश आहे. त्यामुळे या मठाचे प्रमुख देवीस अलंकार चढवताना आणि ते विशिष्ट वेळी उतरवताना जातीने उभे राहतात. 

                       या मठांशिवाय गावाच्या उत्तरेला 'अरणबुवांचा' मठ आणि गावाच्या दक्षिण सीमेवर 'सोमवार गिरजीं'चा मठ आहे.

                   सर्व तीर्थक्षेत्रात असतात तशी तुळजापुरातही बरीच 'तीर्थे' (पवित्र जळे) आहेत काही कुंडांच्या स्वरूपात, काही विहिरी तर काही वाहती आहेत. गावात बिडकर तलाव, कालभैरव तलाव, रामदरा तलाव तसेच अहिल्याबाईंची विहीर, कोटाची विहीर, पिराची विहीर, भगवतीबाईंची विहीर अशा बऱ्याच विहीरी आहेत. 

                      भगवतीबाई ही एक कर्तबगार स्त्री, कदम पाटील भोपे यांच्या घराण्यातील. 'भोपे' म्हणजे भवानीदेवीचे 'पुजारीपण' सांभाळणारे. कोल्हापुरचे भोपेराव घराणे हे भगवतीबाईंचे मूळ घराणे. आम्ही चौकशी करून शोध घेतला तेव्हा 'श्रीछत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्ट कोल्हापूर' यांच्या अखत्यारीतील या जागेत छ. राजाराम महाराजांच्या (महाराणी ताराबाईंचे नातू) कालखंडात बांधलेला इथे वाडा आहे. सध्या त्याची पडझड झाली आहे. वाड्याची दगडी कमान जी शेवटची आठवण जागेवर शिल्लक दिसते, तीही शेवटची घटका मोजताना दिसते. या वाड्याचे दगडही स्थानिकांनी जाग्यावर ठेवलेले दिसत नाहीत. वाड्यात एका दगडी चौथर्‍यावर त्यावेळची श्रीभवानीची अतिसुंदर मूर्ती आहे.  

'श्रीछत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्ट कोल्हापूर', श्रीक्षेत्र तुळजापूर.

छ. राजाराम महाराज कालखंडातील वाडा, श्रीक्षेत्र तुळजापूर. जि.धाराशिव, महाराष्ट्र.

वाड्यातील 'श्री भवानी मंदिर'. श्रीक्षेत्र तुळजापूर, महाराष्ट्र.

                        कोल्हापूरच्या महाराणी ताराबाईंचे नातू 'रामराजे' हे भाऊबंदकीच्या कारस्थानात बळी पडू नये म्हणून ताराबाईंनी त्यांना जन्मापासूनच गुप्तपणे सुरक्षित ठिकाणी ठेवले. ते प्रथम विशाळगडावर अमात्यपंतांच्या नजरेखाली आणि नंतर भगवतीबाईंच्या या घरी तुळजापुरात 'भोप्यांचे' बाळ म्हणूनच वाढले. हेच अल्पवयीन रामराजे पुढे शाहू छत्रपतींच्या निर्णयानंतर साताऱ्याच्या गादीवर नवे छत्रपती म्हणून आरुढ झाले. पुढे करवीरकर छत्रपतींनी कृतज्ञतापूर्वक भगवतीबाईंच्या  वंशजांना कोल्हापुरात आणून मोठे केले. आमच्या भेटी दरम्यान तुळजापूर गावातीलच एक कुटुंब त्यांच्या घराची दुरुस्ती सुरू असल्याने पडलेल्या या वाड्यात राहायला आलेले दिसले.

छ. राजाराम महाराज कालखंडातील वाडा, श्रीक्षेत्र तुळजापूर. जि.धाराशिव, महाराष्ट्र. Historical and Ancient places in Tuljapur, Dist. Dharashiv, Maharashtra.

                         वाड्याच्या उजवीकडे कोल्हापूर संस्थानाच्या या कर्तबगार भगवतीबाईंनी तुळजापुरात येणाऱ्या भाविकांची तहान भागविण्यासाठी सुंदर विहीर बांधली. या विहिरीच्या काठावर देवी भगवतीचे पुरातन छोटे मंदिर दिसते. मंदिरात दिवाबत्ती केलेली दिसते. पुजाऱ्यांच्या (भोपे) घरांनी गराडा घातलेल्या या विहिरीत उजवा वळसा मारून उतरता येते. घडीव पायऱ्यांवरून वळसा मारताना त्यावेळीची सुघड दगडी कमान, कमानीच्या दोन्ही बाजूस देवड्या आणि उजव्या देवडीत श्री गणेशाची भान हरपणारी सुंदर मूर्ती दिसते. विहिरीच्या काठावर रेखीव 'गोमूख' आणि त्यावेळची 'रहाट' व्यवस्थाही दिसते. विहीर सध्या कचरा, गाळाने भरली आहे आणि त्यांच्या जोडीला दुर्गंधी आहेच. ही पुरातन विहीर आणि वाडा गावाच्या 'कमानी वेशी'पासून भवानी मंदिराकडे जाणाऱ्या 'महाद्वार' रस्त्याच्या उजवीकडे आहेत.

'भगवती विहिरी'त समोर कमानीतून उतरणाऱ्या पायऱ्या. श्रीक्षेत्र तुळजापूर. जि.धाराशिव, महाराष्ट्र. Historical and Ancient places in Tuljapur, Dist. Dharashiv, Maharashtra.

भगवती विहिरीच्या कमानीतील 'श्री गणेश'. श्रीक्षेत्र तुळजापूर. जि.धाराशिव, महाराष्ट्र. Historical and Ancient places in Tuljapur, Dist. Dharashiv, Maharashtra.

'भगवती विहिरी'त उतरणाऱ्या पायऱ्या. श्रीक्षेत्र तुळजापूर. जि.धाराशिव, महाराष्ट्र. Historical and Ancient places in Tuljapur, Dist. Dharashiv, Maharashtra.

                        तुळजापूर गावाच्या दक्षिणेस बालाघाट डोंगराच्या कड्यावर 'पापनाशी तीर्थ' आहे. अहिल्याची वंचना करून, कपटाने तिचे शील हरण करणाऱ्या इंद्राची गौतम ऋषींच्या शापातून मुक्तता झाली ती पापनाशी तीर्थात स्नान केल्यामुळे. 

                       'मातंगी कुंड' हे मातंगी देवीशी संबंधित आहे. पूर्वास्पृश्य समाजातील भाविकांप्रमाणे सवर्ण भाविकही नवरात्रात या तीर्थात स्नान करतात.

                      आकाराने मोठे असलेले 'मंकावती तीर्थ' हे भवानी मंदिराच्या पूर्वेकडे आहे. 'विष्णूतीर्थ' या नावाने स्थलपुराणात याचा उल्लेख आहे. 'महिकावती' किंवा 'कोट्टमहिका' या मातृदेवतेशी त्याचा संबंध येतो. या तीर्थाला तीन बाजूंनी प्रवेशद्वारे असून या तीर्थात भवानी आपल्या ६४ योगिनींच्या परिवारासह जलविहार करते अशी श्रद्धा आहे. आम्ही भेट दिली त्यावेळी हे तीर्थ बंद ठेवून त्याची अंतर्गत दुरुस्ती सुरू होती.

                           'नागझरी तीर्थ' हे भवानी मंदिराच्या उत्तरेस कालभैरवाच्या वाटेवर दक्षिण बाजूस डोंगरदरीत आहे. अहिरावणाने वासूकीचे राज्य हिरावून घेतल्यानंतर त्या नागराजाने राज्याच्या पुनर्प्राप्तीसाठी जेथे तप केले आणि त्याच्या तपाचे फळ त्याला मिळाले ते हे स्थान. या तीर्थाचीही महती स्थलपुराणात असल्यामुळे मनोकामना पूर्तीसाठी भाविक या तीर्थात स्नान करतात. नारायण नागबळी असे विधीही इथे होतात.

                      यानंतर आम्ही अहिल्यादेवींनी बांधलेल्या विहिरीचा शोध घेतला. मल्हारराव होळकरांची सून, पुण्यश्लोक माता अहिल्याबाईंनी मल्हाररावांच्या त्यावेळच्या पंधरा सोळा कोटी रुपयांच्या शिल्लकीतून प्रचंड 'धर्म' केला. हे द्रव्य केवळ ब्राह्मणभोजन आणि साधुसंत फकीरांना न वाटता, त्यांनी भारतवर्षात  हिंदू धर्मांच्या पवित्र ठिकाणी मोठमोठ्या वास्तू उभारल्या. गरीब यात्रेकरूंसाठी अन्नपाण्याची सोय लावून दिली. काशी, प्रयाग, गया, हरिद्वार, आयोध्या, रामेश्वर इत्यादी ठिकाणी त्यांनी बांधलेले घाट व मंदिरे प्रसिद्ध आहेतच. तुळजापुरातही 'कमानी वेशी'वर डाव्या बाजूला अहिल्याबाईंनी बांधलेली ही मोठी विहीर त्यांच्या विवेकी धर्मबुद्धीचा आणि उदारतेचा पुरावा देते. 

'अहिल्यादेवींची विहीर'. श्रीक्षेत्र तुळजापूर. जि.धाराशिव, महाराष्ट्र.

                              चौकशी करत या ऐतिहासिक विहिरीजवळ पोहोचलो आणि तीची अवस्था बघून डोळ्यांवर विश्वास बसला नाही. ही पुरातन विहीर गावच्या मुख्य 'कमानी वेशी'वर असून विहिरीच्या तीनही बाजूंनी स्थानिक इमारतींनी गराडा घातला आहे. विहिरीची रस्त्याकडील चौथी बाजू लोखंडी जाळीदार दरवाजाने कुलूपबंद आहे. या दरवाजाच्या तोंडावर अतिक्रमण केलेली आडवी पानाची टपरी'ही दिसते. दरवाजातून आत डोकावून पाहिल्यास विहिरीत प्रचंड वाढलेल्या झुडपातून विहिरीच्या कातळ भिंती, सुंदर दगडी कमान, घडीव पायऱ्या दिसतात. गाळ आणि विहिरीत टाकलेल्या कचऱ्यातून त्या शोधाव्या लागतात. अहिल्याबाईंच्या आगळ्या भक्तीचा आईभवानीलाही अभिमान वाटावा असा त्यांनी दिलेला वारसा आज सांभाळताही येईना याची खंत वाटली.  

'अहिल्यादेवींची विहीर'. श्रीक्षेत्र तुळजापूर. जि.धाराशिव, महाराष्ट्र.  Historical and Ancient places in Tuljapur, Dist. Dharashiv, Maharashtra.

'अहिल्यादेवींची विहीर'. श्रीक्षेत्र तुळजापूर. जि.धाराशिव, महाराष्ट्र.

                     इथल्या विहिरी, तलावांची आणि तीर्थप्रतिष्ठा लाभलेल्या कुंडांची अवस्था मुळात स्वच्छ, सुंदर असायला हवी. पण भवानीमंदिरातील कल्लोळतीर्थ, गोमुखतीर्थ आणि मंकावती तीर्थाव्यतिरिक्त इतर कुंडांकडे  स्थानिक नगरविकास तसेच पुरातत्व खात्याने अगदीच दुर्लक्ष केलेले दिसते. या व्यतिरिक्त काही ऐतिहासिक वास्तू तसेच पुरातन परिवार देवतांच्या जागा, ज्या भवानीशी संबंधित आहेत आता त्यांचे महत्त्व लुप्त होऊन नाहीशा होत चालल्या आहेत.. 

                                                                                                             || श्रीकृष्णार्पणमस्तू ||

                         (श्री तुळजाभवानी मंदिर, भवानीचा प्राचीन इतिहास आणि भवानीचा गोंधळ याबद्दल सविस्तर माहिती sahyadri300.blogspot.com/2025/12/shri-tuljabhavani-tuljapur-dist.html या लिंकवर सविस्तर दिली आहे.)

येथे - जयवंत जाधव

Thursday, 18 December 2025

कुलस्वामिनी 'श्री तुळजाभवानी', श्रीक्षेत्र तुळजापूर, जि. धाराशिव, महाराष्ट्र. Shri Tuljabhavani, Tuljapur, Dist. Dharashiv, Maharashtra.

                    कुलस्वामिनी 'श्री तुळजाभवानी'. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठातील हे आद्यपीठ. श्रीभवानी ज्या डोंगरावर वसली आहे त्या बालाघाट डोंगराचे जूने नाव 'यमुनाचल' (यमन गुड्डू - यमाईचा डोंगर) आहे. याचा कर्नाटक (कन्नड) संस्कृतीशी संबंध येतो. महाराष्ट्रातील श्रीक्षेत्र तुळजापूर हे आज आंध्र, कर्नाटकाच्या सीमेजवळ असले तरी पूर्वकाळी दक्षिण क्षेत्राशी याचा जवळचा संबंध दिसून येतो. कर्नाटकातील सेन, कर्नाट आणि कदंब ही राजकुळे भवानीची उपासना करत. त्यापैकी सेन आणि कर्नाट या कुळांनी तिचा महिमा बंगाल, मिथिला, हिमाचल आणि नेपाळ असा सर्वदूर पोहोचविला. 

                सतराव्या शतकात भवानीचे उरी, शिरी आणि आपल्या अंतःकरणात 'हार्द' धारण करणारे शिवछत्रपती आपल्या स्वराज्य निर्मितीचा संकल्प, ते निर्माण करण्याचे सामर्थ्य, स्वराज्य विस्तार आणि त्याच्या रक्षणासाठी जे दैवी अधिष्ठान हवे ते भवानीचेच आहे, असे मनोमन मानत. त्यांच्यामुळे श्रीभवानी आत्मस्वातंत्र्याबरोबरच  राजकीय स्वातंत्र्याचीही प्रेरणा ठरली. आणि पुढे भारतीय स्वातंत्र्यात ती 'वंदे मातरम' आणि 'भगवती' होऊन अवतरली. युगायुगांच्या अनिष्ठांचा, अमंगलाचा महिषासुर नष्ट करण्याची प्रेरक शक्ती ठरली.

श्री तुळजाभवानी मंदिर भुईकोट, श्रीक्षेत्र तुळजापूर, जि. धाराशिव. Shri Tuljabhavani Temple, Tuljapur, Dist. Dharashiv. 
                     'तुळजापूर' क्षेत्र हे धाराशिव जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. 'बालाघाट' डोंगररांगेतील भवानीचे हे 'ठाणे' सोलापूर पासून सुमारे ४५ किमी आहे. तुळजापुरात राहण्यासाठी अनेक खाजगी भक्तनिवास आहेत. त्यापैकी '१०८, भक्तनिवास तुळजापूर' हे मंदिरसंस्थानाचे अधिकृत भक्तनिवास आहे. इथे राहण्याचे दर माफक असून ते स्वच्छ आणि नीटनेटके आहे. पार्किंगलाही भरपूर जागा असून मोकळ्या प्रशस्त जागेत हे भक्तनिवास दिमाखाने उभे आहे. ऑनलाईन तसेच ऐनवेळी तिथे पोहोचल्यानंतरही राहण्यासाठी बुकिंग करता येते. पण तुळजापुरातील उत्सव काळात मात्र आगाऊ ऑनलाईन बुकिंग करणे सोयीस्कर आहे.
'१०८, भक्तनिवास तुळजापूर'. श्रीक्षेत्र तुळजापूर, जि. धाराशिव. Shri Tuljabhavani Temple, Tuljapur, Dist. Dharashiv.
                    श्री तुळजा मंदिरातील 'भवानी' ही 'गंडकी' शिळेत कोरलेली अष्टभुजा महिषमर्दिनीच्या रूपात आहे. तिच्या मुकुटावर अंगचेच शिवलिंग असून हातात त्रिशूल, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र आणि एका हाताने महिषासुराची शेंडी (शिखा) धरली आहे. पाठीवर बाणांचा भाता आहे. डावा पाय भूमीवर टेकला असून उजवा पाय महिषासुराच्या शरीरावर दाबला आहे. दोन्ही पायांच्या मध्ये महिषासुराचे शीर आहे. भवानीच्या मुखाच्या दोन्ही बाजूंना चिरंतरतेची प्रतीके असलेले 'चंद्र' आणि 'सूर्य' कोरले आहेत. 

                   महिषासुराच्या धडाच्या उजवीकडे भवानीचे वाहन 'सिंह' आहे. त्याखाली भागी 'मार्कंडेय' ऋषी आहेत. डावीकडे भवानीने तारलेली शीर्षासनात तपोमग्न सती 'अनुभूती' आहे. देवीच्या मूर्तीवर चक्राकार कुंडले, केयूर, अंगद, काकणे, कंठा, माळा, मेखला आणि साखळ्या कोरल्या आहेत. 

जगदंबा 'श्री तुळजाभवानी'. Shri Tuljabhavani
 
जगदंबा 'श्री तुळजाभवानी'. Shri Tuljabhavani

                     मंदिरात गर्भगृह, गुढमंडप आणि पुढे सोळाखांबी बांधलेला विस्तीर्ण सभामंडप दिसतो. मंदिराला आधार देणाऱ्या कोरीव कातळ खांबावर आणि मंदिरातील फरसबंदीवर लहान लहान 'खळगे' कोरलेले दिसतात. मंदिरात प्रवेश करतानाही असे असंख्य खळगे बऱ्याच पायऱ्यांवर दिसतात. नवस सांगण्यासाठी आणि फेडण्यासाठी येणारे भक्तजन पूर्वी या खळग्यात नाणी ठोकून बसवत. कधीकाळी या खळग्यात सोन्या चांदीची नाणीही ठोकून बसविली जात असत असे इथले पुजारी सांगतात. आता काही भक्तजन या खळग्यात श्रद्धेने नाणी चिटकविताना दिसतात. 

'गुढमंडप', श्री तुळजाभवानी मंदिर. Shri Tuljabhavani Temple
'सभामंडप', श्री तुळजाभवानी मंदिर.

 

                    सध्या दिसणारे मंदिराचे कलात्मक सुंदर शिखर बीडच्या 'थिगळे' सावकारांनी बांधले. त्यांना अचानक सापडलेले उदंड गुप्तधन म्हणजे कुलदेवता 'तुळजाभवानी'चीच कृपा या उदात्त विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी हे कार्य केले. 

श्री तुळजाभवानी मंदिर गोपुर, श्रीक्षेत्र तुळजापूर, जि. धाराशिव. Shri Tuljabhavani Temple, Tuljapur, Dist. Dharashiv.
                     पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराच्या पूर्वेला 'राजे शहाजी महाद्वार' आणि त्याच्या उजव्या बाजूस 'राजमाता जिजाऊ महाद्वार' अशी दोन उत्तुंग प्रवेशद्वारे दिसतात. दोन्ही दरवाजांच्या मध्ये कमानीयुक्त जी इमारत दिसते त्यात मंदिर व्यवस्थापनाचे कार्यालय, 'धार्मिक संग्रहालय', ग्रंथालय असे आहेत. 'राजे शहाजी महाद्वार' हे भाविकांना मंदिरात प्रवेश करण्यासाठी तर 'राजमाता जिजाऊ महाद्वार' हे भवानीच्या दर्शनानंतर मंदिराबाहेर येण्यासाठी वापरले जाते. दसरा आणि इतर उत्सवकाळात गर्दीचे नियोजन करण्यासाठी या महाद्वारातून प्रवेश बंद केला जातो. या दोन्ही दरवाजांसमोर  मोकळ्या जागेत भवानीच्या दर्शनास येणाऱ्या भाविक सुहासिनी 'हिरवी कांकणे' आवर्जून भरतात.  
'राजे शहाजी महाद्वार' भवानी मंदिर, श्रीक्षेत्र तुळजापूर, जि. धाराशिव. Shri Tuljabhavani Temple, Dist. Dharashiv.

मंदिराच्या आतून दिसणारे उजवीकडे 'राजे शहाजी महाद्वार' आणि डावीकडे  'राजमाता जिजाऊ महाद्वार'. श्रीक्षेत्र तुळजापूर.
                      महादरवाजा आणि त्यापुढील पायऱ्या उतरून आल्यास समोर बंदिस्त दगडी बांधकामाचे 'कल्लोळ तीर्थ' आहे. डावा वळसा मारून आणि पुन्हा उंच पायऱ्या चढून कल्लोळ तीर्थात उतरता येते. जवळजवळ ४० फूट लांब आणि १५ फूट रुंदीच्या, पाषाणात बांधवलेल्या या तीर्थात भाविकांना चढण्या - उतरण्यासाठी स्टीलच्या पायऱ्या बसविल्या आहेत. स्नान करताना भाविक या तीर्थात 'काकणे आणि कुंकू' श्रद्धेने अर्पण करतात. असाध्य चर्मरोग या तीर्थातील पाण्याने बरे होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. अर्पण केलेल्या कुंकूमुळे तीर्थातील पाणी लाल दिसते. मंदिर संस्थानाकडून ते पूर्ववत स्वच्छ केले जाते.

                    या कल्लोळ तीर्थाची महती आरत्या, भुपाळ्या, स्तोत्रांतून आणि भक्ती रचनातून गायलेली दिसते.   

राजे शहाजी महाद्वारातुन - 'कल्लोळतीर्थ' श्रीक्षेत्र तुळजापूर, जि. धाराशिव. Shri Tuljabhavani Temple. 
         
'कल्लोळतीर्थ'. श्री तुळजाभवानी मंदिर. श्रीक्षेत्र तुळजापूर, जि. धाराशिव. Shri Tuljabhavani Temple. 
                     कल्लोळ तीर्थाच्या बाजूलाच उत्तम दगडी बांधणीचे प्राचीन 'गोमुख तीर्थ' आहे. त्याच्या समोर सुंदर शिवपिंडी दिसते. गोमुखातून कोसळणारी स्वच्छ, निर्मळ पाण्याची अखंड धार दिसते. आश्चर्य म्हणजे मराठवाड्यातील या दुष्काळी प्रदेशात इथल्या गोमुखातून निरंतर जलधारा कोसळत असते. इथे येणारा प्रत्येक भाविक स्नानपानासाठी या दोन तीर्थांचा श्रद्धेने वापर करतो आणि मग जगदंबेच्या दर्शनासाठी गर्भगृहाकडे जातो. 
डावीकडे 'गोमुख तीर्थ' आणि उजवीकडे 'कल्लोळ तीर्था'कडे जाणाऱ्या पायऱ्या. श्रीक्षेत्र तुळजापूर, जि. धाराशिव. 

गोमुख तिर्थासमोरील 'शिवपिंडी'. 


 

'गोमुख तीर्थ'. श्री तुळजाभवानी मंदिर. श्रीक्षेत्र तुळजापूर.
    





  

                    पुढे मंदिरात प्रवेश करताना समोर अतिशय सुबक, कातळात घडविलेला 'सरदार निंबाळकर दरवाजा' दिसतो. तुळजाभवानीचे हे देवस्थान प्राचीन असले तरी मंदिराचे बांधकाम शिवकालीन आणि उत्तर काळातील दिसते. पूर्वी हे क्षेत्र हैदराबाद निजामाच्या राज्यात होते. निजामाचे त्यावेळचे मराठा सरदार करमाळ्याचे 'निंबाळकर' यांनी आपल्या या कुलस्वामिनीच्या मंदिर बांधणीत मोठे योगदान दिले.  त्यांच्या नावाचे हे भव्य प्रवेशद्वार आज मंदिराच्या प्राकारात प्रवेश करताना दिसते. 

'सरदार निंबाळकर दरवाजा'. भवानी मंदिर, श्रीक्षेत्र तुळजापूर, जि. धाराशिव. Shri Tuljabhavani Temple, Dist. Dharashiv.


'सरदार निंबाळकर दरवाजा'. (आतून) भवानी मंदिर, श्रीक्षेत्र तुळजापूर, जि. धाराशिव. Shri Tuljabhavani Temple, Dist. Dharashiv.

'सरदार निंबाळकर दरवाजा'. भवानी मंदिर, श्रीक्षेत्र तुळजापूर, जि. धाराशिव. Shri Tuljabhavani Temple, Dist. Dharashiv.

                    या दरवाज्याच्या डाव्या बाजूस उजव्या सोंडेचा जागृत गणपती आहे. तर दरवाजाच्या उजव्या बाजूस आदिमाया, आदिशक्ती 'मातंगी'चे ठाणे आहे. मूळ दुर्गेच्या रूपात दिसणाऱ्या या महाराष्ट्राच्या अधिष्ठात्रीने प्रथम दर्शनाचा मान 'मातंगी'ला दिला आहे. त्यामुळे समाजातील अठरापगड जाती तिने एकत्र आणल्या. मातंगी, यमाई, यल्लमा, रेणुका ही एकाच प्राचीन मातृदेवतेची नावे आहेत. यमाई नावातील 'यम्म' (महिष) या शब्दामुळे आई तुळजाभवानीचे महिषमर्दिनीत सहज रूपांतर घडलेले दिसते.

आदिमाया, आदिशक्ती 'श्री मातंगी' माता. भवानी मंदिर, श्रीक्षेत्र तुळजापूर, जि. धाराशिव.

आदिमाया, आदिशक्ती 'श्री मातंगी' माता.

  

आदिमाया, आदिशक्ती 'श्री मातंगी' माता.
   















     

                       निंबाळकर दरवाजा उतरून डाव्या बाजूने आई भवानीच्या दर्शनाला जाण्यास रस्ता आहे. तर समोर मंदिराचा 'यज्ञ मंडप' दिसतो. यज्ञ मंडपात तेरात्रिकाळ अग्नी प्रज्वलित दिसतो. या यज्ञ मंडपाच्या बाजूला आणखी एक उंच गोपूर दिसतो.  मंदिरा सभोवती तटबंदी असून मंदिराच्या मागे पश्चिमेला 'श्री छत्रपती शिवाजी राजद्वार' हा तिसरा उत्तुंग आणि सुंदर कातळ कोरीव दरवाजा आहे. या पश्चिमेकडील दरवाजातून पायऱ्या उतरून मागील बाजूने मंदिरा बाहेर पडता येते. मंदिराच्या तटबंदीत ठिकठिकाणी बुरुजही स्पष्ट दिसतात.

'यज्ञ मंडप' श्रीतुळजाभवानी मंदिर. श्रीक्षेत्र तुळजापूर.
पश्चिमेकडील मंदिराची तटबंदी. श्रीतुळजाभवानी मंदिर. 

                      थोडक्यात सकल जगताची जननी आणि पराक्रमी भोसले राजकुळाची कुलस्वामिनी तिला शोभेल अशाच 'भुईकोटा'त वसली आहे. 

                          कोटातील या मंदिर प्राकाराला आतून अनेक 'ओवऱ्या' आणि त्यात परिवार देवता आहेत.  

मंदिराच्या पश्चिमेचे 'श्री छत्रपती शिवाजी राजद्वार'. श्रीतुळजाभवानी मंदिर. श्रीक्षेत्र तुळजापूर.


मंदिराच्या मागे दिसणारे पश्चिमेचे 'श्री छत्रपती शिवाजी राजद्वार'.

                        मंदिराच्या प्राकारात यज्ञ मंडपाच्या पलीकडे आणि भवानी मंदिरासमोर  मोठ्या लिंबाच्या झाडाखाली चौथरा आहे. या झाडाच्या सावलीत चौथर्‍यावर येणारे भक्तगण आणि कुटुंबीय भवानीचा 'गोंधळविधी' करताना दिसतात.

                     उजव्या बाजूला ओवऱ्यांमध्ये भवानीला नेसवलेली वस्त्रे दिसतात. ठराविक रक्कम देणगी दिली असता ती वस्त्रे प्रसाद म्हणून देतात.

 

भवानीचा 'गोंधळविधी' करण्याचे ठिकाण. श्री तुळजाभवानी मंदिर, श्रीक्षेत्र तुळजापूर, जि. धाराशिव. Shri Tuljabhavani Temple, Dist. Dharashiv.


प्रसादस्वरूप भवानीला नेसवलेली वस्त्रे. श्री तुळजाभवानी मंदिर, श्रीक्षेत्र तुळजापूर, जि. धाराशिव. Shri Tuljabhavani Temple, Dist. Dharashiv.

श्री तुळजाभवानी मंदिर.

 

                      महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक या प्रदेशांच्या सीमेवरच तुळजापूर क्षेत्र असल्यामुळे भवानी विषयीचा समान भक्तीभाव या तीनही प्रदेशातील भक्तांच्या मनात दिसतो. भवानी मंदिराच्या पायऱ्या चढता - उतरताना मराठी भक्तांबरोबरच तेलगू, कन्नड भक्तांचेही नामलेख त्यांच्या लिप्यांमधून कोरलेले दिसतात. दर्शन, पूजन, नवस फेडीसाठी करायची विधीविधाने हे सारे मराठी भाविकांप्रमाणेच तेलुगु, कन्नड भाविकही तितक्याच तन्मयतेने करताना दिसतात. भवानी चरणी आपल्या भक्तीभावनेचे अर्ध्य अर्पण करण्यासाठी ते तुळजापुरात येतात.  

भक्तांचे 'नामलेख'. श्री तुळजाभवानी मंदिर.
                तुळजा भवानीचे निद्राकाल फारसे दीर्घ नाहीत. भाद्रपदातील कृष्ण नवमीपासून सर्वपित्री अमावस्येपर्यंत एक आठवडा तिचा पहिला निद्राकाल आहे. अमावस्याच्या मध्यरात्रीनंतर ती नवरात्रारंभासाठी जागृत होऊन सज्ज होते. ही जागृती दसऱ्याच्या शिमोल्लंघनापर्यंत असते. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजे अश्विन शुक्ल एकादशीपासून चतुर्दशी अखेरपर्यंत पुन्हा ती निद्रिस्त राहते आणि कोजागिरी पौर्णिमेचा उल्हासमय सोहळा अनुभवण्यासाठी जागी होते. यानंतर पौष शुक्ल द्वितीये पासून सप्तमी पर्यंत तिची तिसरी निद्रा असते. या तिसऱ्या निद्रेनंतर लगेच पौष महिन्यातील शाकंभरीचे नवरात्र असते. 

                      नवी झेप, नवे विक्रम आणि नव्या दिशा चोखाळण्यासाठी भक्तांनी आधी विश्राम घ्यावा असे ही आदिशक्ती सुचित करताना दिसते. 

दसरा पालखी मिरवणूक. साळगांव, ता. आजरा, जि. कोल्हापूर.

दसरा पालखी मिरवणूक. साळगांव, ता. आजरा, जि. कोल्हापूर.



                  दसऱ्यात तुळजापूर मंदिरात भवानीच्या शिमोल्लंघनाची तयारी नवमीच्या मध्यरात्रीपासून करतात. भवानीला पंचामृत स्नान घालून मूर्ती सिंहासनावरून पालखीत ठेवण्यापूर्वी एक लांबच लांब वस्त्र पीळ देऊन मूर्तीभोवती गुंडाळतात. याला 'साखळी करणे' किंवा 'दिंड करणे' म्हणतात. बहुदा ते मूर्तीच्या सुरक्षिततेसाठी असावे. पालखी मंदिराबाहेर शमीच्या पारावर आणतात आणि मूर्ती नवीन पालखीत ठेवतात.

                     ही नवीन पालखी आणि सोबत भवानीचा नवा पलंग अहमदनगरचे 'जनकोजी देवकर' या तेली भक्ताकडून तुळजापुरात दरवर्षी येत असतात. आता ही परंपरा त्यांचे वंशज निष्ठेने सांभाळत आले आहेत. आदल्या दिवशीच तुळजापूरच्या सीमेवर येऊन थांबलेल्या नगरच्या या भक्तमंडळींना नवमीच्या मध्यरात्री समारंभपूर्वक, वाद्यांच्या गजरात मंदिरात आणतात. मंदिर प्रकारात त्यावेळी पालखीजवळ मंदिर व्यवस्थापनाचे मातबर अधिकारी, मानकरी, सेवेकरी, पुजारी, मठाधीश, आराधी, भुत्ये, गोंधळी उपस्थित राहतात. शमीच्या पारावर ठेवलेल्या नवीन पालखीत पुजारी त्या अष्टभुजा  महिषमर्दिनीला ठेवतात आणि असंख्य भाविकांच्या मुखातून जगदंबेचा 'उदोकार' घुमवत, वाद्यांच्या घोषात मंदिर प्राकारातील दक्षिण मार्गाने (मंदिराबाहेर न पडता) कुंकवाच्या सड्यावरून भवानीचे शिमोल्लंघन घडते. मिरवणूक पुन्हा पारावर आल्यावर या सोहळ्याची सांगता होते. यानंतर भवानी नव्या पलंगावर शयन करते. जुना पलंग दसऱ्याच्या होमात विसर्जित केला जातो. मूर्ती नव्या पालखीत ठेवल्यानंतर मानकरी घराण्यातील एक व्यक्ती आपल्या करंगळीला शस्त्राने जखम करून रक्ताचा टिळा भवानीच्या मस्तकी लावते. दसऱ्याच्या या मिरवणुकीत हजारो भाविक सामील होताना दिसतात.

                  भवानीचे शिमोल्लंघन मंदिराच्या प्राकारातच करण्याची प्रथा पूर्वी असुरक्षित राजकीय वातावरणामुळे सुरू झाली. तरीही तुळजापुरचे नागरिक गावाच्या सीमेबाहेर दोन कोसावर असलेल्या शमीवृक्षापर्यंत शिमोल्लंघन करण्यासाठी जातात.

                  अहमदनगरहून तुळजापूरला येणारा भवानीचा नवा पलंग आणि पालखीयात्रा मार्गात ठराविक ठिकाणी मुक्काम करत येते. तिथे भाविक त्यांचे स्वागत करून दर्शन घेतात. या यात्रेतील मुक्कामाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे 'जुन्नर'चा. शिवनेरीच्या पायथ्याचा. हा मुक्काम अधिक काळ घडून जुन्नरमध्ये 'पलंगोत्सव' साजरा व्हावा अशी मुद्दाम व्यवस्था शिवछत्रपतींनी केली होती. आज जुन्नरचे भवानीभक्त ही परंपरा निष्ठेने पाळताना दिसतात.

                     भवानी मंदिराच्या मागे भिंतीला लागून 'चिंतामणी' दगड प्रसिद्ध आहे. त्याला 'सुकनावती' असेही म्हटले जाते. येणारे भाविक इथे गर्दी करताना दिसतात. या दगडावर दहा रुपयाचे नाणे ठेवून मनातील इच्छा किंवा चिंता मनोमन व्यक्त करत, दोन्ही हात दगडावर स्थिर ठेवल्यास हा दगड उजवीकडे किंवा डावीकडे सरकतो. विशेषतः संवेदनशील मनाच्या माता भगिनी आपल्या संसारीक अडचणींची इथे चाचपणी करत असाव्यात असे दिसते.

'सुकनावती'. श्रीक्षेत्र तुळजापूर, धाराशिव, महाराट्र.
'सुकनावती'. श्रीक्षेत्र तुळजापूर, धाराशिव, महाराट्र.

                       'काठ्या' आणि 'कावडी' हे महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या क्षेत्रातील यात्रांचे खास वैशिष्ट्य आहे. जसे कोल्हापूरला जोतिबाच्या विविध ठिकाणाहून देवस्थानांच्या काठ्या येतात तशा तुळजापुरातही येतात.

                      तुळजापुरात 'भातंगळी' ता. उमरगा येथील काठी तर साताऱ्याच्या 'शिरवळ'मधून आई अंबेची आणि शिरवळच्या'च भैरवनाथाची काठी चैत्री पौर्णिमेच्या उत्सवासाठी तुळजापुरात येतात. 

                      सोलापूरहून येणाऱ्या दोन काठ्या मात्र नवरात्रौत्सवाच्या सांगतेसाठी म्हणजे अश्विनी पौर्णिमेच्या उत्सवासाठी येतात. सोलापुरातील शुक्रवारपेठेत जे अंबाबाईचे मंदिर आहे त्या मंदिराकडून निघणारी एक आणि याच मंदिराशी संबंधित असलेल्या 'शिवलाड तेली समाजा'च्या संस्थेकडून निघणारी दुसरी काठी.

                       साताऱ्याहून 'शिरवळ'च्या दोन काठ्या मात्र मुक्काम करत करत आठ दिवसात सुमारे २७५ किमीचे अंतर तोडून तुळजापूरला पोहोचतात आणि ऐन उन्हाळ्यात ही काठीयात्रा अक्षरशः रात्रीचा दिवस करते. काठ्यांचे प्रचंड वजन खांद्यावर पेलीत येणाऱ्या या यात्रिकांच्या निष्ठेला शतशः प्रणाम. या सर्व काठ्या भाविकजन देवतुल्य मानतात. काठ्यांच्या प्रथेमुळे ती ती स्थाने तुळजापूर आणि भवानीशी शतकानूशतके श्रद्धेने जोडली आहेत.   

'कवड्यांची माळ' आणि आईचा जोगवा मागण्यासाठी 'परडी'. श्रीक्षेत्र तुळजापूर, जि. धाराशिव. Shri Tuljabhavani Temple, Dist. Dharashiv.


तुळजापूरचे वैशिष्ठ्य - 'हिरवी कांकणे' श्रीक्षेत्र तुळजापूर, जि. धाराशिव. 

                     इतिहासातील संदर्भ शोधले तर महाराष्ट्राचा इतिहास तुळजाभवानीच्या संदर्भात चौदाव्या शतकाच्या मागे जात नाही. परंतु कर्नाटकातील राजघराण्यांतील इतिहासाच्या आधारे तो आकराव्या शतकाच्याही मागे प्राचीन काळात जातो. 

                   नेपाळमधील 'काठमांडू आणि 'भक्तपुर' या दोन शहरात तुळजाभवानीची मंदिरे भाविकांना आकर्षून घेताना बघून आनंद, आश्चर्य आणि अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही. स्थानिक लोक तिथल्या देवीला 'तलेजु' या नावाने संबोधित करतात. ती मूळची दक्षिणेतील 'तुळजा'भवानीच आहे याची त्यांना जाणीव आहे. 

                      नेपाळच्या काठमांडू येथील तुळजाभवानीचे मंदिर प्रथम 'मिथिले'चा (बिहार) राजा 'हरीसिंहदेव' याने इ.स. १३२४ मध्ये उभारले. त्याआधी त्याचा प्रधान 'चंडेश्वर' याने इ.स. १३१४ मध्ये नेपाळवर स्वारी करून तिथे 'हरीसिंहा'ची सत्ता स्थापित केली. १३२४ ला दिल्लीचा सुलतान 'घियाउद्दीन तुघलक'ने मिथिलेवर (सध्याचे 'बिहार') स्वारी केली. त्यावेळी हरीसिंहाने नेपाळचा आश्रय घेतला आणि त्याने कुलस्वामिनी तुळजाभवानीचे मंदिर प्रथम 'भक्तपुर' येथे उभारले. मिथिलेचा अधिपती हरीसिंह हा 'कर्नाट' वंशाचा होता. 

                     त्याआधीही इ.स. १०९७ मध्ये मिथिलेत आपली सत्ता स्थापित करणारा 'नान्यदेव' हा या 'कर्नाट' वंशातील पहिला राजपुरुष आहे. या काळात दक्षिण आणि पूर्व भारताचे राजनैतिक संबंध दृढ राहिले होते. बंगालच्या 'पाल' राजांच्या पदरी अनेक 'कर्नाट' वंशीय अधिकारी होते. 'नान्यदेव' हाही पालांच्या पदरी असावा. आणि अनुकूल संधी मिळताच तो स्वतंत्र झाला असावा असा इतिहास तज्ञांचा कयास आहे. 'कर्नाट'वंशीय नान्यदेवाचे मूळचे आडनाव 'परमार' होते. तो आपली कुलस्वामिनी 'श्रीतुळजाभवानी'ला नव्या सत्तास्थानातही विसरला नाही. म्हणजेच वर उल्लेख केल्याप्रमाणे तुळजाभवानीचे दक्षिणेतील 'आदिक्षेत्र' हे अकराव्या शतकाच्याही आधीपासून प्रख्यात होते याला आधार मिळतो. 

                      श्री तुळजाभवानीच्या अलौकिक सामर्थ्याच्या कथा ऐकून 'तिबेटी' लोकांनी तिची मूर्ती तिथून चोरून नेण्याचा प्रयत्न केला. पण ते यशस्वी झाले नाहीत. ही हकीकत नेपाळच्या परंपरेत सांगतात.

नेपाळच्या काठमांडू येथील तुळजाभवानीचे 'तलेजु मंदिर'. (Photo courrtesy - Google)




   






'श्री तलेजु' (तुळजाभवानी). काठमांडू, नेपाळ.


                        पुढे 'कर्नाट' वंशीयांची सत्ता संपल्यावर मल्ल, गोरखा या पुढच्या राजवंशांनी श्रीतुळजाभवानीचा 'कुलस्वामिनी' म्हणूनच स्वीकार केला. त्यांची भवानी संदर्भात श्रद्धा इतकी घट्ट होती की, दरवर्षी राजपदावरील पुरुष भवानीच्या (देवीस्वरूप कुमारीकेच्या) हातून मस्तकावर 'राजतिलक' लावून घेत. आणि तरच पुढील वर्षभर राजपदावर राहण्याचा त्याला अधिकार मिळत असे. या 'परंपरेचा'चा अर्थ असा निघतो की, 'हे राज्य तिचे आहे. राजा तिचा प्रतिनिधी म्हणूनच तिच्या राज्याचा कारभार पाहतो.' नेपाळमधील या 'तिलकविधी'वरून इथे शिवछत्रपतींची स्वाभाविकपणे आठवण होते.

                          "राज्य श्रीचे आहे आणि आपण तिचे भोपे (भक्त, पुजारी) आहोत. तिच्यासाठीच आपण प्रतिनिधीच्या रूपात तिच्या राज्याचा भार वाहत आहोत." असे मानणारे शिवाजीराजे नेपाळातील 'तिलकविधी'चा पूर्ववारसा सतराव्या शतकात आईभवानीच्या नावे महाराष्ट्रात चालवीत होते हे सिद्ध होते. 

                        नेपाळ आणि तुळजापुरातील आणखी एक साम्य म्हणजे दोन्हीकडे अश्विनीतला नवरात्र उत्सव दसऱ्यानंतरही पुढे पाच दिवस म्हणजे कोजागिरी पौर्णिमेपर्यंत चालू राहतो. दोन्ही ठिकाणी भवानीदेवीचे क्षेत्रपाल 'भैरवां'चे महत्त्व आहे. नेपाळात कालभैरव - श्वेतभैरव आहेत तर तुळजापुरात काळभैरव - टोळभैरव (बाळभैरव) आहेत.  

तुळजापूरचा क्षेत्रपाल 'श्री काळभैरव मंदिर'. श्रीक्षेत्र तुळजापूर, जि. धाराशिव. Shri Tuljabhavani Temple, Dist. Dharashiv.

तुळजापूरचा क्षेत्रपाल 'श्री काळभैरव आणि बाळभैरव'. श्रीक्षेत्र तुळजापूर, जि. धाराशिव. Shri Tuljabhavani Temple, Dist. Dharashiv.

                     इ. स. १०७० पासून १११९ पर्यंत बाजूच्या बंगालमध्ये 'सेन' घराण्याचे राज्य होते. या घराण्याच्या ताम्रपटातून ते 'ब्रह क्षत्रिय', 'कर्नाट क्षत्रिय' असल्याचा उल्लेख आढळतो. या वंशात 'बल्लाळ' नावाचा राजा झाला. 'बल्लाळ' शब्दाला 'पराक्रमी पुरुष' असा कन्नड अर्थ निघतो. 'बल्लाळपूर' नावाचे एक गाव बंगालच्या या भागात होते. पुढे ते 'विक्रमपूर' असे बदलल्याचे कागदपत्रांवरून समजते. नेपाळमधील 'कर्नाट' हरीसिंहदेव आणि हिमाचलात प्रभावी असणाऱ्या 'सेन' या कर्नाटकीय कुळांचा त्यावेळी निकटचा राजकीय संबंध होता.

                     १९९४ मध्ये 'पिंगुळी'चे श्री ना. बा. रणसिंग आणि श्री मोहन रणसिंग या 'ठाकर' बंधूनी आपल्या जमातीविषयी एक पुस्तक लिहून 'ग्रंथाली'च्या पुढाकाराने प्रकाशित केले. त्यांच्या मते  'भवानीच्या गोंधळाचा उगम 'राजस्थाना'त झाला आणि 'कदम' (की 'कदंब') नावाचे आद्य गोंधळी घराणे राजस्थानातून महाराष्ट्रात आले'. 

                    कदम गोंधळयांनी ठाकर जमातीतील 'मराठे' आडनावाच्या घराण्याकडे हा गोंधळ सोपविला. 'मराठ्यां'नी त्याचे सातत्य राखण्याचा प्रयत्न केला असे रणसिंग बंधू लिहितात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 'कुडाळ' जवळच्या 'पिंगुळी' गावात हे 'मराठे' आडनावाचे 'ठाकर' राहतात. या जमातीतून काही उच्चशिक्षितांना आपल्या जमातीतल्या या अनमोल ठेव्याचे महत्त्व जाणवले आणि त्यांनी भारत आणि भारताबाहेरही त्याचा महिमा गाजवला. 'पिंगुळी' पासून ९ किमीवरील 'हुमरमळा' या गावीही 'मराठे' आडनावाचे गोंधळी घराणे आहे. तेही स्वतःला 'मूळ गोंधळी' समजतात. मालवण तालुक्यातील 'वारड' गावाजवळ 'हडपेवाडी' आहे. या वाडीवरही 'रणशूर' आडनावाचे गोंधळी घराणे आहे. 

                     इतर कुणाला हे गोंधळाचे कौशल्य शिकायचे असल्यास 'मराठे' यांच्याकडून 'टिळा' लावून घ्यावा लागतो. त्यानुसार इतर गोंधळी त्यांचे 'चेले' समजले जातात.   

श्री तुळजाभवानी मंदिर, श्रीक्षेत्र तुळजापूर, जि. धाराशिव.

                   महाराष्ट्रातील ज्या कुटुंबांची कुलदेवता तुळजाभवानी आहे आणि 'गोंधळ' घालण्याचा परंपरागत कुलाचार आहे, ते यजमान वरील गोंधळ्यांना किंवा 'चेल्यांना' आमंत्रित करतात. काही घराण्यात वार्षिक, द्वैवार्षिक किंवा काही खास कारणास्तव गोंधळ करून घेतात. गोंधळ हा बहुतेक रात्रीचा असतो. धार्मिक विधी म्हणूनच तो केला जातो. 

                  या गोंधळ विधीसाठी गोंधळयांचा चार-पाच जणांचा वृंद (Group) असतो. एक नायक, एक संबळवाला, नायकाचा सहकारी, तुनतुनेवाला आणि टाळवाला. यापैकी नायक आणि संबळ्या (संबळ वाजवणारा) या दोघांची भूमिका महत्त्वाची असते. गोंधळी अंगात झब्बा आणि पायघोळ धोतर किंवा तंग विजार परिधान करतात. डोक्यावर पागोटे किंवा फेटा असतो. फेट्याचा शेमला पाठीवर रुळत असतो. आजकाल टोपीही घालतात. गळ्यात मण्यांच्या आणि कवड्यांच्या माळा धारण केल्या जातात. ज्या गोंधळ्यांना आमंत्रित केले जाते ते येताना सोबत देव्हारा आणतात. देव्हाऱ्यात मूर्ति ऐवजी नारळ, सुपारी, देवाचे तांदळे (गोल दगड), धातूचे टाक हे देव रुपात असतात.

गोंधळविधी - भवानीचा 'मांड'. साळगांव, आजरा, जि. कोल्हापूर. 

                   ज्या घरात गोंधळ असतो ते घर व खळे (अंगण) सारवून स्वच्छ करतात. खळ्यात मंडप घालून सजावट केली जाते. तुळशीवृंदावनासमोर 'मांड' भरताना घोंगड्याची घडी अंथरतात. त्यावर हिरवा खण, खणावर पाचशेर तांदूळ, तांदळावर नागवेलीची पाने आणि पाच प्रकारची फळे मांडली जातात. मध्यभागी पाणी भरलेला तांब्याचा घट, त्यावर आंब्याची पाने आणि नारळ ठेवतात. घोंगड्याच्या चार कोनांना उसाची चार (किंवा पाच) 'धाटे' उभी करून त्यांच्या आतील बाजूची पाती मध्यभागी बांधतात. हे सगळे सोपस्कार गोंधळी करतात. हा 'मांड' मांडल्यावर गोंधळी यजमानाला बरोबर घेऊन गावात 'मानकरी' असलेल्या पाच घरी जोगवा मागून धान्य आणतात. पाचवे घर हे स्वतः यजमानाचे असते. त्यावेळी त्यांच्या मुखी, 

                                        जोगवा दे अंबे, जोगवा दे !

                                       श्री भवानीमातेचे नाव घेता, जोगवा दे !


'भवानीचा जोगवा'. साळगांव, ता. आजरा, जि. कोल्हापूर.

                       जोगवा मागून आल्यानंतर देवीला गाऱ्हाणे घालून बकरा बळी देतात. हा बळी महिषासुरासाठी असतो. प्राण सोडण्यापूर्वी महिषासुराने दुर्गेची प्रार्थना केली की 'मला तुझे सानिध्य दे'. दुर्गेने ते मान्य करून गोंधळविधीत त्याच्यासाठी बकऱ्याचा बळी देण्याची आज्ञा भक्तांना केली. देवीचा हा आदेश गोंधळीविधीत पाळला जातो. विधीत बळी दिलेल्या बकऱ्याचा पुढचा पाय गुडघ्यात तोडून, धडापासून मुंडी वेगळी करतात आणि त्या मुंडीच्या तोंडात एक पाय ठेवून ते मुंडके मांडाच्या बाजूला ताटात ठेवतात.

                      यानंतर सुरू होते ते नेत्रदीपक, रोमहर्षक दिवटीनृत्य. गोंधळातला 'नायक' मोठा पोत पाजळतो. दिवटीच्या टोकाशी नरसाळ्याच्या आकाराचा खोलगट भाग करून त्यात चिंध्या घालून त्यावर उडदाचे पीठ मळून थापतो. आणि त्यात भरपूर गोडेतेल रिचवून दिवटी पेटवतो. या मोठ्या दिवटीवर आणखी दहा- पंधरा लहान दिवट्या पेटविल्या जातात. त्या  'दिंड्यां'च्या काठीच्या असतात.

                       अशी तयारी झाल्यावर यजमान आणि त्यांचे पुरुष आत्मीयजन मंडपात येतात. देवीला पुन्हा गाऱ्हाणे घालतात. त्यानंतर नायक संबळाच्या तालावर अनेक देवतांना गोंधळासाठी येण्यास आवाहन करतो..

                                     आरंभ झाला, आरंभ झाला यावे |

                                     गोंधळ मांडीला, गोंधळाला यावे ||

                                     भोळ्या भक्ताच्या गोंधळाला यावे |

                                     भक्ता घरी गोंधळाला यावे ||

                                     अंबाबाई, गोंधळाला यावे |

                                     गोंधळ मांडीला गोंधळाला यावे ||

                                     महालक्ष्मी गोंधळाला यावे ||

                      गोंधळ्यांच्या या आवाहनानंतर गोंधळात देवता अवतीर्ण होतात अशी सर्व उपस्थितांची श्रद्धा असते. यानंतर तरुण पुरुष पुढे येऊन नायकाच्या मोठ्या दिवटीवर पेटवलेल्या लहान दिवट्या हातात घेतात. आणि मांड व तुळशीवृंदावन यांच्याभोवती फेर धरून 'उदो उदो'चा घोष घुमवीत नाचत राहतात. गोंधळ्यांचे खणखणीत स्वरातले गाणे, संबळीचा दणदणाट आणि भडकणाऱ्या दिवट्यांचा रिंगण धरलेला फेर, या भारलेल्या वातावरणात अनेकांच्या अंगात देवता संचारताना दिसतात. 

'भवानीचा गोंधळ - दिवटी नृत्य'. साळगांव, ता. आजरा, जि. कोल्हापूर.

'भवानीचा गोंधळ - दिवटी नृत्य'. साळगांव, ता. आजरा, जि. कोल्हापूर.

  

                       नायकाच्या गीतात त्यातीलच एक दिवट्या म्हणून 'देवीचा परशुराम बाळ' याचाही ओघाने उल्लेख येतो. गोंधळाची देवी महेिषमर्दिनी, 'भवानीचा बाळ' म्हणून 'परशुरामा'चा होणारा हा उल्लेख म्हणजे रेणुका आणि तुळजाभवानी यांच्या एकत्वाची 'भवानी हीच रेणुका' असल्याची खात्री देतो.

                     जसे मातृभक्त 'परशुराम' हा आई रेणुकेचा पुत्र आणि रेणुकेच्याच नवसातून सिंदखेडच्या जाधवांच्या घरी जन्मलेली राजमाता जिजाऊ. पुढे जिजाऊच्या नवसातून शिवनेरीवर जन्मलेले मातृभक्त 'शिवछत्रपती'. दोघेही उदंड कीर्तीचे. हा काळाचा घटीत योग दिसतो. 

                       दक्षिण भारतातील अभ्यासक डॉ. एम. शेषाद्री यांनी १९६३ मध्ये पेन्सिलवानिया विद्यापीठातील साउथ एशिया सोसायटीत 'महिषमर्दिनी' या विषयावर एक प्रदीर्घ शोधनिबंध सादर केला. ते लिहितात 'संकट काळात अनेक थोर पुरुषांनी तिला (भवानीला) आवाहन केले आहे. १७ व्या शतकात शिवाजीराजांनी तिला हाक दिली. १९ व्या शतकात १८७० मध्ये बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी 'वंदे मातरम' हे प्रख्यात गीत रचून दुर्गा भवानीचे जागरण घडविले. आणि १८९० मध्ये अरविंद घोष यांनी 'भवानीमंदिरा'च्या राष्ट्रउभारणी संकल्पनेतून बंगाल आणि उर्वरित भारतातील जनतेच्या अंतकरणात 'सामर्थ्याची जननी' म्हणून तिची प्रतिमा निर्माण केली. त्यांनी राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या आंदोलनामागे तिचे सामर्थ्य उभे केले'.

श्री महालक्ष्मी यात्रा उत्सव, स.न. २००९. साळगांव, ता. आजरा, जि. कोल्हापूर.

                     बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांना वंदे मातरम हे गीत स्फूरले ते ७ ऑक्टोबर १८७५ च्या दुर्गोत्सवात. नवरात्रातील अष्टमी ही 'दुर्गाष्टमी' म्हणून देवी उपासनेची अत्यंत पवित्र मानली जाते. दुसऱ्या दिवशी 'महानवमी' किंवा 'अक्षयनवमी'. 'दशमी' हा दुर्गोत्सवाचा शेवटचा दिवस. महाराष्ट्रात हा दिवस 'दसरा' म्हणून साजरा होतो. पूर्व बंगाल, पश्चिम बंगाल आणि ओरिसा या तीन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या बंगाल प्रांताचे उच्च प्रशासन अधिकारी असलेल्या ऋषीतुल्य बंकिमचंद्रांना जगदंबा दुर्गेचे दर्शन घडले ते अष्टमीच्या दिवशी आणि 'वंदे मातरम' गीत स्फूरले ते महानवमीच्या दिवशी. मातृभूमीच्या मुक्ततेसाठी आसुसलेल्या तिच्या एका प्रतिभाशाली पुत्राला दुर्गोत्सवात मातृभूमीच्या भौगोलिक सौंदर्याच्याही पलीकडील जे विराट रुप दिसले ते 'असुरसंहारिणी दुर्गे'चे..

                                                  ।। श्री कृष्णार्पणमस्तु ।।

येथे - जयवंत जाधव

श्रीक्षेत्र तुळजापुरातील ऐतिहासिक आणि पुरातन स्थळे, जि. धाराशिव, महाराष्ट्र. - Historical and Ancient places in Tuljapur, Dist. Dharashiv, Maharashtra.

                        श्री तुळजाभवानीचा महिमा अनेक संत, महात्म्यांनी गायला. स्वातंत्र्यवीरांची ती ऊर्जास्तोत्र आहे. आद्य शंकराचार्य तसेच अ...