Monday 11 January 2021

येडशी रामलिंग मंदिर (Yedshi Ramling Temple)

                  मराठवाड्यातील बार्शी - लातूर प्रवासात 'येडशी' घाट लागतो. अवर्षणग्रस्त (कमी पाऊस) असलेल्या या भागात हा घाट रस्त्याचा प्रवास मात्र खूप निसर्गरम्य आहे. शासनानं हा अभयारण्य विभाग जाहीर केला आहे. बार्शीहून पूर्वेला सरासरी ४५ किमीवर या अरण्यात लातूरला जाताना 'बीड - उस्मानाबाद' हा आडवा महामार्ग दिसतो. या महामार्गावर डावीकडं वळण घेतल्यास, इथं रामायण काळातील  एक पुरातन महादेव मंदिर आहे. अगदी अभयारण्याच्या मधोमध, हिल स्टेशनवर आणि दरीच्या कोंदणात असलेलं हे मंदिर आणि परिसर निसर्गरम्य आहे. दरीत सरासरी १११ पायऱ्या  उतरून मंदिरात जावं लागतं. त्यामुळं दुरून या मंदिराचा ठावठिकाणा लक्षात येत नाही.
दरीच्या कोंदणातील 'श्री रामलिंग' मंदिर (Yedshi Ramling) 
 
मंदिरामागील दक्षिण प्रवेश बाजू (Yedshi Ramling) 

              'बालाघाट' डोंगररांगेतील हे थंड हवेचं ठिकाण असल्यानं बीड, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील निसर्गप्रेमींना हे पर्यटनाचं ठिकाण बनलं आहे. 'येडशी रामलिंग घाट अभयारण्य' नावानं ते प्रसिद्ध आहे.  

              सरासरी कमी पावसाची नोंद असल्यानं इथं आपटा, अर्जुन, अंजनी, बेहडा सारखी मध्यम आकाराची आणि विशेषतः करवंदीची झुडपं मोठ्या प्रमाणात दिसतात. या घाट प्रवासात ससा, मुंगूस, मोर यासारखे वन्य जीव रस्त्यात दर्शन देतातच देतात.

जटायु समाधी (Yedshi Ramling) 

 

मंदिरासमोरील बाजू (Yedshi Ramling) 
  
                सीतेचं अपहरण करून लंकेस जाताना, रामभक्त जटायुनं या अरण्यात रावणाशी झुंज दिली. रावणाशी युध्द करून घायाळ अवस्थेत पडलेल्या जटायूची रामभेट या ठिकाणी झाली. श्री रामांनी इथं बाजूला जमिनीत बाण मारून जलउत्पती केली. जलप्राशन करून जटायुनं प्राण सोडले. पुढील तीन दिवस श्रीरामांनी  या ठिकाणी वास्तव्य केलं आणि दरम्यान शिवलिंगाची स्थापना करून पूजा केली. अशी आख्यायिका देवळातल्या गुरवानं सांगितली. या घटनेमुळं या ठिकाणाला पौराणिक वारसाही मिळाला आहे.   
           
पुरातन शिवलिंग (Yedshi Ramling) 

मंडपातील नंदी (Yedshi Ramling) 
 
   

           मंदिरामागेच जिथं पाण्यासाठी बाण मारला तिथं सध्या गुहेचं स्वरूप आहे. पाण्याची एक संततधार या गुहेतून बाहेर पडताना दिसते. तर बाजूलाच दरडीवरून कोसळणारा धबधबा आहे. पावसाळयात इथं पाण्याचा प्रपात असतो. श्रावणात आणि पावसाळ्यात भाविक आणि पर्यटकांची गर्दी असते. 
              शिवलिंग प्राचीन असून आधी अहिल्याबाई होळकरांनी हे मंदिर बांधलं. सध्या आजूबाजूचा प्राकार वगळून मुळ मंदिराचा नव्यानं  जीर्णोद्धार केलेला दिसतो. गाभाऱ्यात प्राचीन शिवपिंड आहे तर सभामंडप प्रशस्त असून मंडपात सुंदर कलाकुसर केलेला पितळेचा मोठा उभा नंदी आहे.                                                                                                       
मंदिरासमोरील नितळ नदी 
 
धबधबा आणि समोर श्रीराम निर्मित गुहा (Yedshi Ramling) 

                  देवळाला वळसा मारून शांत वाहणारी छोटी नदी, तिचं नितळ पाणी, बाजूलाच धबधबा आणि नदीचं पुढं जंगलात लुप्त होत जाणं खूपच छान आहे. परिसर शांत आणि निवांत आहे. बार्शीहून हा 'तेर'चा प्रवास पूर्ण या  अभयरण्यातून झाला. आमचं 'तेर' हे पुढचं मुख्य नियोजन असल्यानं औटघटकेसाठी या मंदिराचीही भेट झाली.
मंदिराला वळसा मारणारी नदी (Yedshi Ramling) 
    

Yedshi Ramling 

         सूचना :-   इथली माकडं मात्र उच्छादी आहेत.    

                                       || श्री कृष्णार्पणमस्तू ||  

येथे - जयवंत जाधव

Friday 1 January 2021

बुलंद भुईकोट - "किल्ले परांडा" (Paranda Fort)

                 भुईकोट किल्ल्याचा दरारा आणि रुबाब बघायचा, तर एकदा "परांडया"ला भेट द्यावीच. नळदुर्ग आणि आमचं कुलदैवत राजराजेश्वरी 'श्री तुळजा भवानी' इतकंच ठरवून निघालो होतो. पण अर्ध अंतर कापेपर्यंत बऱ्याचशा मराठवाड्याची जुळणी झाली.

              आधी 'पुणं' सोडून 'उजनी धरण प्रकल्प' लागेपर्यंत, मराठवाडा हा उजाड, मैदानी, भकास रानमाळ असा समज होता.

किल्ले परांडा (Paranda Fort )

               पण 'उजनी' प्रकल्पानं मराठवाड्यास काही प्रमाणात संजीवनी दिली आहे. पुढचं काम इथल्या कष्टाळू आणि मेहनती लोकांनी पूर्ण केलंय. पुणे - सोलापूर महामार्ग टेंभुर्णीत सोडून, परांड्यासाठी डावीकडं वळण घेतल्यास, छोट्या पण व्यापारी तत्वावर इथं तूर, द्राक्षं, पपई, कांदा, बोरं, पेरू आणि सर्वाधिक केल्या जाणाऱ्या उस लागवडीतून 'विठ्ठल' सहकारी साखर कारखाना, यामुळं इथला शेतकरी सधन झाल्याचं दिसतो.

             शहरीकरणाच्या बाबतीत उस्मानाबाद सर्वात वेगानं वाढणारं शहर असलं तरी, प्राचीन इतिहास असूनही पर्यटनाच्या बाबतीत  मागेच राहिलं असं म्हणावं  लागेल. इथले गड किल्ले आणि इतर धार्मिक  स्थळं एकमेकांपासून आणि मुंबई - पुण्यापासून दूर असल्यानं काहीशी उपेक्षित राहिली. पण इथं आल्यावर हा गैरसमज दूर झाला. असो..

          'परांडा' हे तालुक्याचं गांव आहे. गावात शिरून किल्ल्याची चौकशी करत अगदी मुख्य दाराजवळ पोहोचेपर्यंत किल्ल्याचा अंदाज येत नाही. तिथं पोहोचण्यासाठी गजबजलेली आणि अरुंद रस्त्यावर वाढलेली बाजारपेठ ओलांडावी लागते. आणि ही कसरत करून इथं पोहचलो की, 'परांड्या'च्या पहिल्याच दर्शनानं धडकी भरते.. 

                   किल्ल्या सभोवती ठेवलेला रुंद, खोल पाण्याचा खंदक, तिथल्या भेदक तोफा आणि किल्ल्याच्या मजबूत दुहेरी तटबंदीनं या किल्ल्यास अजिंक्य ठेवलं आहे. आक्रमण करण्यापूर्वी शत्रूला दहादा विचार करायला लावणारा आहे. जमीनीवरील किल्ल्यास लागणारं लष्करी स्थापत्यशास्त्र आणि उत्कृष्ट शिल्पकलेचा सुरेख संगम इथं दिसतो. 

             किल्ल्यात जाण्यासाठी खंदकावर सध्या पक्का पूल बनवला आहे. पूर्वी तो लाकडी होता. युद्धप्रसंगी उचलून घेतला जाई. चहू बाजुनं पाण्याचा खंदक आणि त्यात सोडलेल्या मगरींमुळं पहिली आक्रमणाची लाट किल्ल्याबाहेरच थोपवली जाई. किल्ल्याच्या चहू बाजुनं दुहेरी उंच तटबंदी आहे. तटबंदीत चऱ्यां आणि किल्ल्यातून खंदकापलीकडं शत्रूवर वेगवेगळ्या कोनातून मारा करण्यासाठी जंग्या ठेवल्या आहेत. 

            इ. स. १५९९ ला मुघलांनी अहमदनगरच्या निजामाचा पराभव केला. पण आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी, निजामाच्या सरदारांनी शाह अलीचा वयानं लहान असलेला मुलगा 'मूर्तझा' यास गादीचा वारस ठरवून अहमदनगरपासून दक्षिण पूर्वेला १३० किमीवर असलेल्या 'परीमंडा' (परांडा) किल्ल्यावर आणले. त्यामुळं परांडा काही काळ राजधानी बनून राहिली.

              इ.स. १६२८ दरम्यान हा किल्ला दोन वर्षांसाठी निजामशाहीत असताना शहाजी राजांच्या ताब्यात होता. पुढे आदिलशाही, मुघल, आदिलशाही आणि पुन्हा मुघल असा या किल्ल्यानं बराच मुस्लिम राजवटींचा काळ  बघितला. त्यामुळंच कदाचित त्याच्या स्थापत्यशैलीत बदल होत गेला असावा. 

               किल्ल्याच्या मुख्य दरवाजाची दगडी कमान भव्य असून, दारं नजीकच्या काळात बनवलेली दिसतात. या दारात छोटा दिंडी दरवाजा केला आहे. इथून आत प्रवेश केल्यानंतर, उजवीकडे कमानदार ठेंगण्या आणि अंधाऱ्या बोळातून वळण घेत रस्ता दुसऱ्या दरवाजातून बाहेर पडतो. या बोळातून खंदकापलीडील शत्रूवर तोफमारा करण्यासाठी, तटबंदीत दिवळ्यांची रचना केलेली आहे. 

                  दुसऱ्या दरवाजातून आत आल्यावर, समोर चहू बाजूंनी वेढलेली एक प्रशस्त मोकळी जागा दिसते. यालाच 'रणमंडळ' म्हटलं जातं. आणि हेच 'रणमंडळ' या किल्ल्याचं बलस्थान आहे.

रणमंडळातील देवड्या 
अंधार बोळ आणि तोफांची जागा  
        
               इथं 'रणमंडळात' डावी उजवीकडं पहारेकऱ्यांच्या देवड्या असून समोर अंगावर येणारे महाकाय अर्धगोल बुरूज आहेत. या बुरुजातून जागोजागी आणि वरुन समोरून चहू बाजुनं मारा करण्यासाठी जंग्या ठेवल्या आहेत. सध्या इथं समोरच्या प्रत्येक जंगीतून, रणमंडळात तोफांची तोंडं डोकावताना दिसतात. इथं पोहचल्यावर पुढं  किल्ल्यात कुठून घुसावं याचा विचार करु लागणाऱ्या शत्रूला, या जागेवर मारा करून सहजच नेस्तनाबूत केलं जायचं.

               'रणमंडळात' उजवीकडं बुरूजाच्या तटबंदीत वरील भागात अप्रतिम शिल्पकलेनं बनवलेले सुंदर सज्जे दिसतात. सज्जाच्या दोन्ही बाजूला, किल्ल्याचे राजचिन्ह असलेले 'व्याल' कोरले आहेत. इथंच किल्ल्याच्या मुख्य प्रवेश दाराचा एक लाकडी दरवाजा ठेवला असून, ऊन पावसामुळं तो आता जीर्ण झालेला दिसतो. 

रणमंडळातून दिसणारे व्याल (Paranda Fort)  
रणमंडळात ठेवलेला दरवाजा 

             या बुरूजांच्याच आडाला उजवीकडं किल्ल्याचा तिसरा दरवाजा आहे. या तिसऱ्या महाकाय दरवाजाच्या लाकडी दाराचे अवशेष मात्र अजूनही जागेवर शाबूत आहेत. दारावर लोखंडी सुळे असलेल्या आडव्या पट्ट्या असून, बलदंड साखळदंडाने जखडला आहे.

               

तिसरा दरवाजा 
रणमंडळातील बुरूज आणि डावीकडे देवड्या  

          या दरवाजातून आत आल्यावर समोर किल्ल्याचा अर्धगोलाकृती महाकाय 'ढाल काठी' बुरूज दिसतो. बुरुजावर अप्रतिम शिल्पकलेचा सज्जा आणि सज्जावरच नगारखाना दिसतो.


ढाल  काठी बुरूज आणि समोर नगारखाना 
      
          इथून मात्र दोन्ही तटबंदीमधून डावी उजवीकडं जाण्यास मार्ग आहेत. डावीकडील मार्गातून खंदकानंतरची पहिली आणि मध्ये ४० फुट अंतर ठेवून किल्ल्याची मुख्य दुसरी तटबंदी, यामधून किल्ल्याला वळसा मारू शकतो. खंदकालाच लागून असलेल्या तटबंदीत चर्या आणि बाहेरील शत्रूवर मारा करण्यासाठी जंग्या ठेवल्या आहेत.

तटबंदीतील चर्या आणि जंग्या  
भुयारी मार्ग 
 बुरुजातील सज्जे (Paranda Fort) 

 
          
               पुढे जाताना बाजूच्या दुसऱ्या मुख्य तटबंदीत अर्धगोल आणि वर निमुळते होत जाणारे उंचच उंच बुरूज आहेत. बुरुजांवर  बाहेर काढलेले सज्जे आहेत. इथून मुख्य तटबंदीखालून किल्ल्यात जाणारे भूयारी मार्ग आहेत. सध्या वाढलेल्या झुडपांमुळे आत जावू शकलो नाही. पुढे किल्ल्यामागे दोन्ही तटबंदीच्या मध्ये प्राचीन महादेव मंदिर आहे.

दुहेरी तटबंदीतील महादेव मंदिर (Mahadeo Temple)

   पुन्हा मागे येऊन तिसऱ्या दरवाजाजवळून उजवीकडे वळताच,महाकाय बुरुजांना आणि तटबंदिला वळसा मारून रस्ता किल्ल्याच्या सर्वात उंच, महाकाय चौथ्या दरवाजात येतो. चौथ्या दरवाज्यासमोर एक अंदाजे ५० फुट खोल आणि अरुंद विहीर आहे. विहिरीत बारमाही पाणी आहे. दारासमोरच असल्याने पुरातत्व विभागाने ती लोखंडी जाळी ठेवून सुरक्षित केली आहे. चौथा दरवाजा अतिशय भव्य, सुबक आणि किल्ल्याच्या वैभवात भर घालणारा असून दरवाजाच्या चौकटीवर फारशी शिलालेख आहे. 

चौथ्या दरवाजा समोरील विहीर
 


           चौथा दरवाजा ओलांडून रस्ता उजवीकडे कमानीवजा पाचव्या दरवाज्यातून मुख्य किल्ल्यात येतो. समोरच डावीकडे दगडी प्रशस्त मस्जिद दिसते. मस्जिदिसमोरच रणमंडळातून दिसणाऱ्या, नगारखाना असलेल्या 'ढाल काठी' बुरुजावर जाण्यास पायऱ्या दिसतात. आत मस्जिदीत जाताच डावीकडे 'वजू' करण्यासाठी पाण्याचा हौद दिसतो.

मस्जिदिसमोरील ढाल काठी बुरुजासाठी पायऱ्या  




मस्जिदी समोरील 'वजू' हौद  


किल्ल्यातील मस्जिद 

मस्जिदिवरील मिनार   

 सध्या तो कोरडा आहे. हौदासमोरच उजवीकडं मस्जिद आहे. मस्जिदीच्या छताला आधार देणारे नक्षीचे सुबक दगडी खांब आहेत. दगडी छतालाही सुंदर त्रिमितीची नक्षी आहे. खांबावरील आणि छतावरील कोरलेली नक्षी ही मंदिरात कोरलेल्या चिन्हांची दिसते. पूर्वी तिथं 'मानकेश्वर मंदिर' होतं. 


मस्जिदीतील सुबक खांब  

                कर्नाटकातील धारवाड येथील 'होन्नती' गावी इ. स. ११२४ चा एक शिलालेख आढळतो. त्या शिलालेखानुसार या किल्ल्याचे नाव 'पलियंडा' असून, इथं 'महामंडलेश्वर सिंघनदेव'च राज्य होतं. यावरुन हा किल्ला इ. स. ११२४ च्या आधीचा आणि हिंदू राजवटीतील असावा. पुढे बहामणी काळात सुलतानचा वजीर 'महमुद गवान'नं पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात पुन्हा नव्यानं बांधला. त्याकाळानंतर मंदिराचं मस्जिदित रुपांतर झालं असावं.
              वर मस्जिदीवर जाण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था असून, वर चार कोपऱ्यात चार आणि मध्ये दोन असे सहा छोटे मिनार दिसतात.


 
मस्जिदिवर जाण्यासाठी पायऱ्या  

              बाहेर, मस्जिदीच्या समोरच उजवीकडं नगारखान्याच्या बुरुजावर पायऱ्या चढून गेल्यास पंच धातूची, वीस फुट लांब, सुंदर नक्षी असलेली एक प्रचंड तोफ ठेवली आहे. तोफेवर एकूण ६ फारशी लेख कोरले असून तोफेच्या वर्तुळाकार तोंडावरही लेख आढळतो. तोफेवर वितभर उंचीचे दोन सिंह आहेत पण, त्यापैकी एकाचे तोंड मानेपासून कापून नेले आहेत. रणरणत्या उन्हात देखील ही तोफ थंड राहते.




मस्जिद (Paranda Fort)

 पंचधातूची तोफ  


           या 'ढाल काठी' बुरूजावरून किल्ल्यातली सुंदर मस्जिद आणि पूर्ण किल्ला नजरेच्या टप्यात येतो. तर मागे येऊन पाचव्या कमानीवजा दराजवळून उजवीकडं वळल्यास बाजूला दारुगोळा कोठार दिसतं. कोठारात वेगवेगळ्या आकाराचे तोफगोळे असून काही ओतीव तोफा ठेवल्या आहेत. कोठार जाळीनं कुलूप बंद केलं आहे. सध्या तिथं आत वाटवाघूळांचं राज्य दिसतं.
 
दारुगोळा कोठार 
            कोठाराच्या पुढंच हमामखाना असून, किल्ल्याची साफसफाई करताना सापडलेल्या मुर्त्या तिथं ठेवल्या आहेत. त्यामध्ये पाच फुट उंचीची आणि सहा हात असलेली गणेश मूर्ती, पाच फन्याची नागदेवता, पार्श्वनाथांची मूर्ती, विरगळ, गद्धेगळ ओळीनं मांडून ठेवल्या आहेत.


             समोरच प्रशस्त अष्टकोणी आणि बहुमजली विहीर आहे. विहीरीच्या प्रत्येक मजल्यावर  उतरण्यासाठी व चकवा देण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था आहे. आत उतरण्याचा रस्ता सध्या झुडपांनी भरला आहे. पण प्रयत्न करून आत जाता येतं. या विहीरीचं पाणी हत्तीनं उपसलं जायचं असं म्हणतात. विहीरीच्या दगडांवर ठिकठिकाणी नक्षी कोरली असून ही विहीर किल्ल्याच्या वैभवात भर घालते. 
    
अष्टकोणी विहीर (Paranda Fort) 


              





               
       सध्या तिथं आजूबाजूला खूप रान माजलं आहे. विहीरीच्या पुढेच दगडी उंच कमान ओलांडून गणेश मंदिर आहे. मंदिरात गरुडावरील श्री विष्णूची मूर्तीहि आहे. मंदिरासमोरच एक समाधीही दिसते.


विहिरीत उतरण्याच्या पायऱ्या 
गणेश मंदिरासमोरील समाधी


                 किल्ल्याच्या तटावरून पावसानंतरची झुडपं आणि वाढलेल्या रानामुळं गडफेरी करण्यास अडचण येते. सध्या किल्ल्याची साफसफाई दुर्लक्षितच दिसते. 
               किल्ल्याच्या तटबंदीत एकूण सव्वीस बुरूज असून प्रत्येक बुरुजावर वेगवेगळ्या घडणीच्या आणि धडकी भरवणाऱ्या तोफा ठेवल्या आहेत. 'लांडा कासम', 'खडक', 'बांगडी तोफ', 'अझद पैकर'(सर्परूप) अशा नावांच्या, पूर्ण बुरूज व्यापणाऱ्या अजश्र तोफा आजही तिथं आहेत. त्यांची विध्वंस करण्याची आणि होणाऱ्या आवाजाची फक्त कल्पना करू शकतो.

photo courtesy :- Google
photo courtesy :- Google
   

                 'मलिक-मैदान' तोफ मुळची इथलीच सांगितली जाते. ती तर निजामशाहीची ताकद मानली जायची. पण नंतरच्या काळात अदिलशाहीचा सेनापति 'मुरार जगदेव'नं ती किल्ला ताब्यात येताच आदिलशहाला भेट दिली. सध्या ती विजापूर किल्ल्यातील उखळी बुरुजावर विसावली आहे. चारशे बैल, दहा हत्ती आणि शेकडो सैनिक लावून ती त्यावेळी विजापूरला हलविल्याचं सांगितलं जातं.

                इथल्या तोफा, दुहेरी गुंतागुंतीची तटबंदी, रणमंडळ आणि किल्ल्याचा खंदक हे 'परांडा' चं खास वैशिष्ट्य आणि ताकद आहे. शिवाय 'रणमंडळ' आणि जंग्यातुन ठेवलेल्या तोफा हे सगळं बघण्यासारखं आहे. किल्ल्याचा आकार एकूण आयताकृती असून, सभोवती दुहेरी गुंतागुंतीची तटबंदी आणि खोल रुंद खंदकानं किल्ल्याला अभेद्य केलेलं दिसतं. लष्करी दृष्ट्या अत्यंत कौशल्यानं किल्ल्याची बांधणी केली असून, इथं शिल्पकलेचे सुंदर नमुने आहेत. 
           सध्या किल्ल्याच्या खंदकात गावभरच्या गटाराचं सांडपाणी सोडलं असून, झुडूपांनी खंदक व्यापलेल्या दिसतो. गावच्या राहिवाशांनी खंदकाबाहेरच मातीचे ढिगारे लावले आहेत. पुरातत्व खात्याचंही म्हणावं तितकं लक्ष दिसत नाही.
झुडुपांनी भरलेला खंदक 

किल्ल्याबाहेरील मातीचे ढिगारे (Paranda Fort)
       

                 
                









               या वरील गोष्टी नजरअंदाज केल्यास, इतिहासाचा साक्षीदार म्हणून हा किल्ला बघण्यासाठी खरोखर अप्रतिम आहे. 
                
               छत्रपतींचं स्वराज्य त्या काळी सह्याद्री आणि कोकण, असं मर्यादित राहिल्यानं हा किल्ला मराठी साम्राज्यात सामील झाला नाही. पण स्वराज्याचे सरसेनापती नेतोजी पालकरांनी त्या वेळी परांड्याच्या आजूबाजूला छापे घालून जरब ठेवल्याची नोंद मिळते.
 
               उत्तर आणि दक्षिणेतील प्राचीन व्यापारी मार्गावरील 'परांडा' महत्त्वाचं ठाणं असल्याचं जवळच असलेल्या 'धाराशिव' लेण्यानं (उस्मानाबाद) सिद्ध केलं आहे. त्यामुळं प्रत्येक राजवटीला 'परांडा' आपल्या ताब्यात ठेवण्याचा हव्यास होताच. हे जमीनीवरील 'ठाणं' किती सशक्त आणि दरारा निर्माण करणारं होतं, याची कल्पना 'परांड्या'च्या भेटीतच कळते..   

                                  || श्री कृष्णार्पणमस्तू ||

येथे - जयवंत जाधव      

ऑफबीट - खरोसा लेणी, निलंगा, जि. लातूर Offbeat - Ancient Kharosa caves, Dist. Latur, Maharashtra.

                        महाराष्ट्रात वैशिष्ट्यपूर्ण अशी बरीच लेणी आहेत. काहींची प्रसिद्धी तर जगभर पोहोचली आहे. त्यांची कोरीव कलाकुसर आजही थक...