Friday, 30 January 2026

'किल्ले कर्नाळा' - ता. पनवेल जि. रायगड, महाराष्ट्र. 'Karnala Fort', Panvel, Dist. Raigad, Maharashtra.

                       रोजच्या धावपळीतून थोडी मोकळीक मिळाली की, दूर निवांत निसर्गाच्या सानिध्यात जाण्यास सर्वजण उत्सुक असतात. पण सर्वांनाच हा योग जुळतो असे नाही. याबाबत मुंबई ठाण्यापासून जवळच रायगड जिल्ह्यातील पनवेलबद्दल सांगायचे तर, पनवेल हे घाटमाथ्यावरून बोरघाट (लोणावळा) उतरून मुंबईकडे आणि तळकोकणातून गोवा महामार्गावरून मुंबईत प्रवेश करण्याचे दक्षिणेचे मुख्य प्रवेशद्वार. देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या उंबरठ्यावर आणि भौगोलिक दृष्ट्या सह्याद्रीच्या धारेतील माथेरान, कर्जत, लोणावळा अशा निसर्गरम्य डोंगररांगेंच्या जवळचे ठिकाण. 

                        माथेरान रांगेतील विकटगड, चंदेरी, सोंडाई, कर्नाळा, ईर्शाळ, प्रबळगड, कलावंतीण तर कर्जत डोंगररांगेतील कोथळीगड, भिवगड, ढाकबहिरी तसेच माणिकगड, सांकशी असे अनेक गिरीदुर्ग पनवेलच्या अगदी जवळच म्हणता येतील. चढाईच्या श्रेणीत यातील काही मध्यम, काही अवघड तर काही धडकी भरवणारे अत्यंत अवघड आणि प्रसंगी जीवावर बेतणारे असेही आहेत. यातील चंदेरी, ढाकबहिरी वगळता इतर सर्व गिरीदुर्गांची चढाई आजपर्यंत पत्नी आणि मुलांसमवेत केली. त्यांचे भन्नाट अनुभव लिहिण्याचा योगही त्या त्या वेळी आला. त्या आठवणी नक्कीच विसरता येणार नाहीत. विशेष म्हणजे यातील काही गिरीदुर्ग हे अगदी पनवेल रेल्वे स्टेशनवरूनही दिसतात. आणि हे सर्वच येणाऱ्या डोंगरभटक्यांना चढाईचे आव्हान देतात. 

                    त्यापैकी 'किल्ले कर्नाळा' हा पनवेल तालुक्याच्या दक्षिणेला १५ किमीवर, माथेरान डोंगररांगेच्या निसर्गरम्य गर्द झाडीत आणि पर्यटनाच्या बाबतीत अग्रगण्य असा गिरिदुर्ग म्हणता येईल. पनवेल सोडल्यास 'पळस्पे' फाट्यावर उजवा वळसा घेऊन मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून 'पेण'ला जाताना आजूबाजूचे राखीव आणि संवर्धित अभयारण्य पर्यटकांना चांगलेच परिचित आहे. या जंगलाच्या मध्यावर डावीकडे डोंगरावर हा विशिष्ट आकाराचा सुळका लक्ष वेधून घेतो. इतिहासाच्या प्राचीन आठवणी सांभाळत समुद्र सपाटीपासून २५०० फूट उंच आणि त्यावर त्याचा अंदाजे १८० फुट उंच अंगठ्याच्या आकाराचा कातळ सुळका (Thumbs Up) एखाद्या स्थितप्रज्ञासारखा उभा आहे. 

                  बरेच पर्यटक इथून जाता येताना आजूबाजूच्या ढाब्यावर चहापाण्यासाठी थांबतात. घाईत असल्यामुळे त्यांना या ठिकाणास भेट देता येत नाही. पण इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी 'पेण'कडे जाणा-येणाऱ्या एसटी बससाठी विनंती थांबाही आहे. मुंबई ठाण्यापासून जवळच आणि किल्ल्यास अभयारण्याची जोड मिळाल्याने बऱ्याच शैक्षणिक सहली निसर्ग अभ्यासा सोबत इतिहासाची ओळख करून घेण्याच्या निमित्ताने इथे येताना दिसतात. स्वतःचे वाहन असल्यास पनवेलहून अवघ्या अर्ध्या तासात हे ठिकाण गाठता येते. आमच्या राहत्या पनवेल तालुक्यातच हा असल्याने आजपर्यंत बऱ्याच वेळा आमची या गिरीदुर्गास भेट झाली आहे. त्यानेच आम्हाला डोंगरी किल्ले आणि भटकंतीचं बाळकडू दिलं असं आम्ही मानतो.

'किल्ले कर्नाळा' - 'लिंगोबाचा डोंगर' सुळका, किल्ले कर्नाळा, ता. पनवेल, रायगड, महाराष्ट्र. Karnala Fort Pinnacle, Karnala Fort, Raigad, Maharashtra.

                      जानेवारी २०२६ ला मुंबईच्या एल्फिस्टनला राहणारा मित्र विजय केळकर सोबत पुन्हा एकदा किल्ले कर्नाळ्यास भेट दिली. पनवेलहून किल्ल्याच्या अलीकडे ५ कीमी पायथ्याच्या 'शिरढोण' गावापासूनच या जंगलाची सुरुवात होते. त्यापुढे गर्द झाडांमधून जाणाऱ्या रस्त्यावर लाल, काळ्या तोंडाची माकडे आणि वानरांचा वावर दिसू लागतो. महामार्गावर जंगलाच्या मध्यावर डावीकडे 'कर्नाळा पक्षी अभयारण्याची कमान दिसते. अभयारण्यास भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी इथे रु.६० आणि मुलांसाठी ३० रु. प्रवेश शुल्क, तर त्यांच्या वाहनांसाठी वेगळे पार्किंग शुल्क आकारले जाते. किल्ल्यावर जाणाऱ्या पर्यटकांनी सोबत आणलेल्या प्लास्टिक पाण्याच्या बाटल्यांसाठी गेटजवळ प्रत्येक बाटलीमागे २० रुपये ठेव (Deposit) घेतले जाते. परत येताना त्या रिकाम्या बाटल्या दाखवल्यास घेतलेली रक्कम परत दिली जाते.

                       १२ चौरस किमी पेक्षाही जास्त विस्तारलेल्या या अभयारण्यात जवळजवळ २०० पक्ष्यांच्या जाती आणि प्रजाती वावरताना आढळतातत. त्यात मलबार ट्रोगॉन, राखट धनेश यांच्या बरोबर मोर, खंड्या (Kingfisher), भारद्वाज, सुतारपक्षी, मैना असे बरेच पक्षी तर माकड, ससा, रानडुक्कर, मुंगूस, साप, घोरपड असे प्राणी जंगलात आहेत. किल्ल्यावर जाणारी पायवाट वगळता हरियाळ, गारमाळ, मोरटाका, ताडंबा अशा राखीव निसर्ग वाटांवरूनही इथल्या पक्षी आणि प्राण्यांचे अवलोकन करता येते. विशेषता ऑक्टोबर ते फेब्रुवारी या हिवाळी महिन्यात स्थलांतर करून येणारे दुर्मिळ आणि सहसा इतरत्र न दिसणारे पक्षीही इथे दिसतात. सकाळी ६.३० ते ८.०० या शांत वेळेत इथे पक्षांची विशेष लगबग असते. यासाठी दूर दूरचे पक्षी निरीक्षक, अभ्यासक आणि निसर्गप्रेमी आपली दुर्बीण आणि कॅमेऱ्यांसोबत पहाटेच या जंगलात हजेरी लावताना दिसतात. 


कर्नाळा पक्षी अभयारण्य. Karnala Bird Sanctuary 

कर्नाळा पक्षी अभयारण्य. Karnala Bird Sanctuary 
                     कर्नाळ्याच्या पायथ्याचे 'कल्हे' गावातील महिला बचतगट इथे माफक दरात दुपारचे शाकाहारी आणि मांसाहारी जेवण तसेच नाश्त्याची उत्तम सोय करताना दिसतात. या हॉटेलच्या डाव्या बाजूने पायवाट किल्ल्यावर जाते. 

 

'कल्हे' गावातील महिला 'बचत गटाचे हॉटेल'. Karnala Fort, Raigad, Maharashtra.

'पायवाट'. किल्ले कर्नाळा, रायगड, महाराष्ट्र.

                      पायथा ते किल्ल्याचा दक्षिणेकडील शेवटचा टेहळणी बुरुज इथपर्यंत तीन टप्प्यात जाणारी ही पाऊलवाट जवळ जवळ दोन तास दमछाक करते. पाऊलवाटेचा पहिलाच टप्पा मोठमोठे दगड धोंडे ओलांडत तीव्र चढाने आणि वाटेत येणाऱ्या झाडांच्या आडव्या मुळ्यांमधून जाते. सध्या वनविभागाने वाटेवर आडव्या येणाऱ्या ओढ्यांच्या ठिकाणी पायऱ्यांसाठी दगड रचून त्यावर लोखंडी जाळी बसवली आहे. पावसात वाहून येणारी माती, गाळ या दगडांमध्ये जमून त्या पायऱ्या पुढे पक्क्या होतील. हा पाऊण तासाचा टप्पा दमवणारा असला तरी गर्द झाडांमुळे गारवा देतो. या वाटेवर झाडांच्या आडव्या मुळ्या आणि झाडांवर चढलेल्या वर्षानुवर्षाच्या वेली चांगल्याच फोफावलेल्या असून लक्ष वेधून घेतात. वाटेवर ठीक ठिकाणी वनविभागाने पर्यटकांना बसण्यासाठी बाकडे आणि शेडची व्यवस्थाही केली आहे.  




'पायवाट'. किल्ले कर्नाळा, रायगड, महाराष्ट्र. Karnala Fort, Maharashtra.
 











                                                        या टप्प्यानंतर पाऊलवाट उजवीकडे वळून डोंगरसोंडेवर येते. या वळणावर पलीकडून रसायनीच्या 'पोसरी' गावातून डोंगर चढून येणारी एक पाऊलवाट किल्ल्याकडे जाणाऱ्या वाटेला मिळते. पण ती फारशी प्रचलित नाही. या डोंगरसोंडे पुढील दुसरी टेकडी ओलांडत वाट पुढच्या डोंगरसोंडेवर येते. इथून समोर दूर डोंगरावर किल्ले कर्नाळ्याची तटबंदी आणि त्याचा नयनरम्य सुळका नजरेस पडतो. 

पोसरी गावातून येणारी आणि उजवीकडे वळून डोंगर सोंडेवर जाणारी पाऊलवाट.
                                  पुढे वाट गर्द झाडीत घुसते आणि अर्ध्या तासानंतर  'श्री कर्नाई' मातेच्या घुमटी जवळ येते. घुमटीत चौथर्‍यावर 'कर्णाई' मातेची सिंहारुढ सुंदर मूर्ती आहे. समोरच दमून आलेल्या पर्यटकांना बसण्यासाठी शेड आणि बाकड्यांची व्यवस्था आहे. 
डोंगर सोंडेवरुन - किल्ले 'कर्नाळा सुळका'. 'Karnala Pinnacle', Karnala Fort, Raigad, Maharashtra.

श्री 'कर्णाई माता' मंदिर. किल्ले कर्नाळा, ता. पनवेल, रायगड, महाराष्ट्र. Karnala Fort, Raigad, Maharashtra.

श्री 'कर्णाई माता' मंदिर. किल्ले कर्नाळा. Raigad, Maharashtra.

                      पुढे दगड धोंड्यातून चढत पाऊलवाट किल्ल्याच्या तटबंदीत येते. पूर्वी इथे किल्ल्याचा दरवाजा असावा. या दरवाजाचे दोन्ही चौकटीचे अवशेष वगळता तो उध्वस्त झालेला दिसतो. पुढे नागमोडी वळणे घेत येणारी वाट किल्ल्याच्या उत्तर पायथ्याशी असलेल्या सपाटीवर येते. इथून किल्ल्याचा मुख्य भाग सुरू होतो.




                          पुढची वाट कातळ उतारावरून किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजातून वर येते. दरवाजासमोर जेमतेम अरुंद वाट आणि उजव्या बाजूस खोल दरी दिसते. नजीकच्या काळात या दरवाजासमोर दगडी पायऱ्या रचल्या आहेत. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी रेलिंगही बसविले आहे. दहा-बारा वर्षांपूर्वी इथे या दोन्ही गोष्टी नव्हत्या. त्यामुळे या टप्प्याची चढाई साहसी आणि पावसाळ्यात विशेषतः कातळावरील शेवाळ्यामुळे धोकादायक वाटायची. आजही पावसाळ्यात या टप्प्यावर नवख्यांनी विशेष खबरदारी घ्यावी. 

'किल्ले कर्नाळा', ता. पनवेल, रायगड, महाराष्ट्र. Karnala Fort, Panvel, Raigad, Maharashtra.

किल्ल्याचा 'पहिला दरवाजा'. किल्ले कर्नाळा, ता. पनवेल, रायगड, महाराष्ट्र. Karnala Fort, Panvel, Raigad, Maharashtra.


'दुसरा दरवाजा'. किल्ले कर्नाळा. Karnala Fort.
                      किल्ल्याचा हा दुसरा दरवाजा मोडकळीस आला असून त्याला लोखंडी खांबांचा आधार दिला आहे. या दरवाजाच्या उजव्या बाजूला किल्ल्याचा बुरुज आणि चौकटीच्या बाजूला कोरलेला 'व्याल' स्पष्ट दिसतो. डाव्या बाजूची तटबंदी झाडांच्या मुळ्यांनी पोखरली असल्याने इथला 'व्याल' निखळला असावा.

  

'दुसरा दरवाजा'. किल्ले कर्नाळा, ता. पनवेल, रायगड, महाराष्ट्र. Karnala Fort, Panvel, Raigad, Maharashtra.

सुळक्याखाली गवतात पूर्वेचे 'बुरुज आणि तटबंदी'.


                       दरवाजातून डावा वळसा घेत, उध्वस्त पायऱ्या चढून वाट किल्ल्याच्या पुढच्या तटबंदीतील तिसऱ्या 'गोमुखी' दरवाजात येते. 

             तर उजवीकडे कातळ सुळक्याखाली किल्ल्याची पश्चिम तटबंदी, तटबंदीतील बुरुज आणि खाली दरी दिसते. इथे वाढलेल्या गवतामुळे जमिनीलगतच्या तटबंदीपुढील धोकादायक दरीचा अंदाज येत नाही. त्यामुळे भटके आणि पर्यटक या बाजूला सहसा फिरकत नाहीत. अपघात होऊ नये म्हणून उजवीकडील ही बाजू बंद ठेवली आहे. 

  

तिसरा  'गोमुखी' दरवाजा. किल्ले कर्नाळा, ता. पनवेल, रायगड, महाराष्ट्र. Karnala Fort, Panvel, Raigad, Maharashtra.

                     डाव्या बाजूच्या गोमुखी दरवाजासमोर फारच कमी जागा ठेवली आहे. तसेच या जागेस उतार दिल्यामुळे बाहेरून शत्रूला फार हालचाल करता येत नाही. हा दरवाजा बऱ्यापैकी शाबूत असून कोरीव कमानदार आहे. याच्या चौकटीला टोकदार खिळ्यांचे सुंदर लाकडी दरवाजे नव्याने बसविले आहेत. 

                     या दरवाजाच्या भुई अंतर्गत चिंचोळ्या पायऱ्या चढून वर आल्यास किल्ल्याच्या सपाटीवर येता येते. दरवाजावरून तोफमाऱ्यासाठी तटबंदीत दिवळ्या ठेवलेल्या दिसतात. या माचीवर भगवा फडकताना दिसतो. किल्ल्यात प्रवेश करण्याचा हा एकमेव उत्तरेकडील दरवाजा किल्ल्याचे बलस्थान असून, किल्ल्याची शोभा वाढवताना दिसतो.  

'तिसरा दरवाजा'. किल्ले कर्नाळा.
'भुई अंतर्गत पायऱ्या'. तिसरा दरवाजा, किल्ले कर्नाळा.

तिसऱ्या दरवाजातून वर येणाऱ्या 'भुई अंतर्गत पायऱ्या'. किल्ले कर्नाळा, ता. पनवेल, रायगड, महाराष्ट्र. Karnala Fort, Panvel, Raigad, Maharashtra.
तिसऱ्या दरवाजातुन दिसणारे किल्ल्यावर येणारे 'उत्तरेकडील पायवाटेचे टप्पे'. किल्ले कर्नाळा, ता. पनवेल, रायगड, महाराष्ट्र. Karnala Fort, Panvel, Raigad, Maharashtra.

तिसऱ्या दरवाजातुन - 'डावीकडे धान्य कोठार आणि सुळका'. किल्ले कर्नाळा, ता. पनवेल, रायगड, महाराष्ट्र. Karnala Fort, Panvel, Raigad, Maharashtra.

                       समोर किल्ल्याच्या पठारावर डावीकडे छप्पर नसलेले वाड्याचे अवशेष आहेत. कदाचित ते धान्य कोठार असावे. पूर्वी आमच्या अनेक भेटीत या वाड्याजवळ एक भली मोठी शिवपिंडी दिसायची. पण आता ती दिसत नाही. वाड्यासमोर आणखीन दुसऱ्या वाड्याचे अवशेष दिसतात. याच्या पलीकडे किल्ल्याच्या पूर्व कड्याची तटबंदी दिसते.  

कातळ टाक्यांकडे जाणारी 'उध्वस्त तटबंदीतून वाट'.
Karnala Fort, Panvel, Raigad, Maharashtra.

                        यानंतर उजवीकडे किल्ल्याच्या पश्चिम कड्यावर भटक्यांना आकर्षित करणारा आणि गिर्यारोहकांना नेहमीच आव्हान देणारा किल्ले कर्नाळ्याचा प्रचंड कातळ सुळका दिसतो. सुळक्याच्या पायथ्याला कातळात टाक्या खोदल्या आहेत. पूर्वी या टाक्यांकडे येण्यासाठी तटबंदीतून वाट असावी. टाक्या शत्रूच्या हल्ल्यापासून तटबंदीने सुरक्षित केल्या असाव्यात. आता ती उध्वस्त दिसते. सुळक्यावरून ओघळून खाली येणारे पावसाचे पाणी या टाक्यांमध्ये जमा होते. काही टाक्या इतक्या प्रशस्त मोठ्या आहेत की त्यांना वरच्या सुळक्याला आधार देणारे कातळखांब ठेवले आहेत. सुळक्यावर चढाई करण्यासाठी मात्र प्रस्तरारोहण साहित्य आणि ती कला अवगत असणे गरजेचे आहे.  

सुळक्याच्या पायथ्याच्या 'खोदीव कातळ टाक्या'. किल्ले कर्नाळा, Karnala Fort.


सुळक्याच्या पायथ्याच्या 'खोदीव कातळ टाक्या'. किल्ले कर्नाळा, Karnala Fort.


सुळक्याच्या पश्चिमेकडील 'खोदीव कातळ टाक्या' आणि खाली 'मुंबई गोवा महामार्ग'. किल्ले कर्नाळा, Karnala Fort. Maharashtra.


                       सुळक्याच्या उत्तरेला मध्यावर मधमाशांचा वर्षानुवर्षांचा अधिवास आहे. पर्यटकांनी फार गोंगाट केल्यास अथवा तिथे आजूबाजूला आग पेटविल्यास  हल्ला केल्याच्या घटना आजवर झाल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी योग्य ती खबरदारी घ्यावी. 

                  दुर्गमहर्षी गो. नी. दांडेकर यांची 'जैत रे जैत' ही कादंबरी इथल्या मधमाशांच्या पोळ्यावर आधारित आहे. पुढे या कादंबरीवरच 'जैत रे जैत' या मराठी चित्रपटाची निर्मिती झाली. चित्रपटात मधमाशांचे पोळे, पोळ्याची राणीमाशी, चिंधी, नाम्या आणि लिंगोबाचा डोंगर यांच्याभोवती पूर्ण चित्रपटाचे कथानक फिरते. चित्रपटातील प्रसिद्ध  'लिंगोबाचा डोंगर' म्हणजेच 'किल्ले कर्नाळा'. कै स्मिता पाटील आणि डॉ. मोहन आगाशे या कलाकारांनी या चित्रपटात ताकदीने भूमिका साकारल्या. चित्रपटातील चिंधीच्या अविस्मरणीय भूमिकेमुळे १९७८ ला कै. स्मिता पाटील यांना पहिले 'राष्ट्रीय फिल्म पारितोषिक' (National Film award) देण्यात आले. तर कथानकातील सावळ्या आदिवासी 'नाम्या'च्या भूमिकेसाठी, गोऱ्या गोमट्या डॉ. मोहन आगाशें'ना चित्रीकरण दरम्यान उन्हात उभे केले जात असे. ही माहिती काही वर्षांपूर्वी माझ्या सासूबाईंनी गप्पांच्या ओघात दिली होती. असो..         

                        सुळक्याच्या दक्षिणेकडे काही पायऱ्या उतरल्यास किल्ल्याचा चौथा दरवाजा दिसतो. त्याच्या उजव्या बाजूस पहारेकऱ्यांची सुंदर देवडी आहे. पण सध्या ती जीर्ण दिसते. दरवाजासमोरच तीव्र उतार असून त्यापलीकडे तटबंदीने संरक्षित केलेला कातळ बुरुज दिसतो. समोरच्या त्या बुरुजापर्यंत पोहोचण्यासाठी मध्ये दगडी भिंतीचा पूल बनविला आहे. काही पायऱ्या चढून वर आल्यास या पुढच्या बुरुजावर जमिनीच्या कातळात आयताकृती पाण्याचा हौद खोदलेला दिसतो. या हौदाजवळून दक्षिणेकडील पुढच्या बुरुजावर जाण्यासाठी जमिनीखाली पायऱ्या बनविल्या आहेत. या पायऱ्यांची रचना सुंदर बघण्यासारखी आहे. 

दक्षिणेकडील 'चौथ्या दरवाजाकडे'. किल्ले कर्नाळा, Karnala Fort. Maharashtra.


दक्षिणेकडील 'चौथा दरवाजा'. किल्ले कर्नाळा, Karnala Fort. Maharashtra.

बाहेरून - दक्षिणेकडील चौथा दरवाजा आणि तटबंदी. किल्ले कर्नाळा, Karnala Fort, Panvel, Raigad, Maharashtra.

तटबंदीने संरक्षित केलेला 'दक्षिणेकडील बुरुज'. किल्ले कर्नाळा, Karnala Fort, Panvel, Raigad, Maharashtra.

                         किल्ल्याच्या दक्षिणेकडील या पाचव्या आणि शेवटच्या दरवाजाची रचनाही विशेष सुंदर आहे. दरवाजाच्या चौकटीवर घडीव दगडांची सुंदर कमान असून चौकटीच्या दोन्ही बाजूला शक्तीची प्रतीके 'शरभ' शिल्पे कोरली आहेत. दरवाजा ओलांडून पायऱ्या उतरून आल्यास समोर किल्ल्याच्या पुढच्या दक्षिण बुरुजावर जाता येते.

                       किल्ल्याच्या दक्षिणेकडील या दोन उंच नैसर्गिक टेकड्या वर टोकाला सपाट तासून, तटबंदीने संरक्षित करून अगदी अप्रतिम आणि कल्पकतेने किल्ल्यास जोडले आहेत. सध्या इथल्या तटबंदीचा बराचसा भाग ढासळलेला दिसतो. किल्ल्याच्या या बुरुजावरून उत्तरेला मलंगगड, पूर्वेला प्रबळगड,  इरशाळगड, अग्नेयेला माणिकगड, दक्षिणेला सांकशी, सागरगड यांच्या सोबतच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग अप्रतिम दिसतात.  

दक्षिण बुरुजावरील 'कातळटाकी'. किल्ले कर्नाळा, Karnala Fort, Maharashtra.



दक्षिणेकडील दुसऱ्या बुरुजावर जाणारा दरवाजा - 'अंतर्गत पायऱ्या'. किल्ले कर्नाळा, Karnala Fort, Maharashtra. 

दक्षिणेकडील दुसऱ्या बुरुजावर येणार 'पाचवा दरवाजा'. किल्ले कर्नाळा, ता. पनवेल, रायगड, महाराष्ट्र. Karnala Fort Pinnacle, Karnala Fort, Raigad, Maharashtra.
                      पर्यटन आणि जैवविविधतेच्या बाबतीत अग्रस्थानी असणाऱ्या या किल्ल्याने इतिहासातही मोलाची भूमिका निभावली. तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवांचे आणि पुढील काळात गुजरातच्या सुलतानाचे उत्तर कोकणातील एक प्रांत मुख्यालय या किल्ल्यावर होते. यादवांच्या काळात बांधलेला हा किल्ला १५४० ला अहमदनगरच्या निजामाने गुजरातच्या सुलतानाकडून जिंकून घेतला. त्यामुळे चिडलेल्या सुलतानाने पोर्तुगीज सैन्याच्या मदतीने किल्ला परत जिंकून घेतला. त्यानंतर किल्ल्याच्या रक्षणाची जबाबदारी त्याने पोर्तुगीजांवर सोपवून तो पुन्हा गुजरातला गेला. पण पोर्तुगीजांच्या ताब्यातील या किल्ल्यावर निजामाने पुन्हा पुन्हा हल्ले सुरूच ठेवले. त्यामुळे कंटाळून पोर्तुगीज कप्तान 'डी मेन्जेस' याने 'किल्ले कर्नाळा' आणि बाजूचा 'किल्ले सांकशी' निजामाकडून विकत घेतले. पुढे कधीकाळी हा करार तुटला आणि 'किल्ले कर्नाळा' निजामाने पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. १६३६ पर्यंत निजामाच्या ताब्यात असलेला हा किल्ला नंतर आदिलशहाच्या ताब्यात आला. 
                         १६५७ मध्ये कोकण स्वारीत कल्याण, भिवंडी सोबत शिवछत्रपतींनी किल्ले कर्नाळा स्वराज्यात सामील करून घेतला. त्यानंतर १६६५ च्या पुरंदर तहात किल्ले कर्नाळा औरंगजेबास द्यावा लागला. तहात दिलेले हे किल्ले पुढील काळात छत्रपतींनी जिंकून घेतले. पुढे पेशवाई लयास जाऊन दुसऱ्या बाजीरावांच्या कालखंडात मे १८०३ मध्ये कर्नाळ्याचा ताबा इंग्रजांकडे आला. १८१८ पर्यंत किल्ले कर्नाळ्यावर वहिवाट होती. तसेच १८१८ पर्यंत आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा 'अनंतराव फडके' हे या गडाचे किल्लेदार होते. पुढे इंग्रजांनी गडावरील वहिवाट पूर्णपणे बंद केली. पुढील भारताच्या स्वतंत्र्यसंग्रामात 'वासुदेव बळवंत फडके' यांनी भूमिगत होऊन किल्ले कर्नाळा आणि आजूबाजूच्या निबिड जंगल परिसराचा पुरेपूर उपयोग केला. 
दक्षिणेकडील 'दुसऱ्या बुरुजावरून दिसणारा किल्ले कर्नाळा सुळका'. किल्ले कर्नाळा, ता. पनवेल, रायगड, महाराष्ट्र. Karnala Fort Pinnacle, Karnala Fort, Raigad, Maharashtra.

 

दक्षिणेकडील दुसऱ्या बुरुजाची 'उध्वस्त तटबंदी'. किल्ले कर्नाळा. 

                       परतीच्या वेळी आम्ही किल्ले कर्नाळ्याच्या पायथ्याचे, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या 'शिरढोण' गावास भेट दिली. गावातील 'वासुदेव फडकें'चा ऐतिहासिक वाडा ग्रामपंचायतीने काळजी घेऊन छान संवर्धुन ठेवला आहे. कमरेइतक्या उंच चौथर्‍यावर आणि दगडी कुंपणात हा भक्कम वाडा बांधला आहे. वाड्याला आधार देणारे मोठमोठे रुंद सागाचे खांब, त्याखालचे तळखडे आणि रुंद तुळया तसेच वाड्यातील त्या वेळच्या गरजेनुसार असलेली खोल्यांची ठेवण, जमिनीवरील शेणाचे सारवन हे सर्व भारावून टाकणारे आहे. वाड्याच्या मागच्या बाजूस त्यावेळची स्वतंत्र विहीर असून पाणी शेंदण्याची उत्तम व्यवस्थाही दिसते.   

आद्य क्रांतिकारक 'वासुदेव बळवंत फडकेंचा वाडा''शिरढोण', ता. पनवेल, रायगड, महाराष्ट्र. Karnala Fort Pinnacle, Karnala Fort, Raigad, Maharashtra.


फडकेंच्या वाड्यामागील 'विहीर'. 'शिरढोण', ता. पनवेल, रायगड, महाराष्ट्र. Karnala Fort Pinnacle, Karnala Fort, Raigad, Maharashtra.
                        दीड वर्षांपूर्वीच आम्ही सातारा जिल्ह्यातील 'वाई' जवळ नाना फडणवीसांच्या 'मेणवली' वाड्यास भेट दिली होती. मेणवली'च्या वाड्याचा पसारा या वाड्यापेक्षा नक्कीच मोठा आहे. पण दोन्ही वाड्यांच्या अंतर्गत रचनेत बरेच साम्य दिसते. तो कृष्णेकाठी तर हा कर्नाळ्याच्या पायथ्याला, भेटीस येणाऱ्यांना इतिहास सांगत उभे आहेत..

                                                      || श्री कृष्णार्पणमस्तू ||

येथे - जयवंत जाधव

Monday, 29 December 2025

श्रीक्षेत्र तुळजापुरातील ऐतिहासिक आणि पुरातन स्थळे, जि. धाराशिव, महाराष्ट्र. - Historical and Ancient places in Tuljapur, Dist. Dharashiv, Maharashtra.

                        श्री तुळजाभवानीचा महिमा अनेक संत, महात्म्यांनी गायला. स्वातंत्र्यवीरांची ती ऊर्जास्तोत्र आहे. आद्य शंकराचार्य तसेच अनेक संतांचा या तुळजापूर क्षेत्राला चरणस्पर्श झाला. तर अनेक राजपुरुष, रणधुरंदर भवानीचा आशीर्वाद आणि कृपेसाठी तिच्यासमोर झुकले, तिला शरण गेले. 

                      या श्रीक्षेत्र तुळजापुरातील पुरातन, ऐतिहासिक स्थळांचा शोध घेतल्यास, तुळजापूर आणि भवानीदेवीचा क्षेत्रपाल 'श्री कालभैरव' याचे अनन्य साधारण महत्व तुळजापुरात आहे. भवानी मंदिराच्या दक्षिणेस बालाघाटाच्या कड्यावर हे कालभैरवाचे मंदिर आहे. तुळजाभवानी नंतर कालभैरवाच्या दर्शनाशिवाय भवानी दर्शन पूर्ण होत नाही असा पूर्वापार समज आहे. कालभैरवाच्या मंदिरातील मूर्ती त्याच्या नावाला आणि कीर्तीला शोभेल अशीच उग्र भयानक आहे. आणि त्याला शोभेल असाच 'मांस' आणि 'गांजा'चा नैवेद्य अर्पण केला जातो. प्रक्षाळपूजा झाल्यानंतर दररोज त्याला गांजाची चिलीम भरून दिली जाते. तो गांजा ओढतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. तो सर्पबाधानिवारक आहे. त्याच्या मंदिरात वावरणारे साप भक्तांना बाधत नाहीत असे मंदिराचे पुजारी ॲड. ओमकार मस्के सांगतात. त्यांना संतुष्ट करण्यासाठी प्रत्येक वर्षी अश्विन अमावस्येला मंदिरात 'भेंडोळी' हा विलक्षण विधी खेळला जातो. 

श्री काळभैरव - बाळभैरव (टोळभैरव), श्रीक्षेत्र तुळजापूर, जि. धाराशिव, महाराष्ट्र. Historical and Ancient places in Tuljapur, Dist. Dharashiv, Maharashtra.


श्री काळभैरव - बाळभैरव (टोळभैरव) मंदिर, श्रीक्षेत्र तुळजापूर, जि. धाराशिव, महाराष्ट्र. Historical and Ancient places in Tuljapur, Dist. Dharashiv, Maharashtra.



श्री काळभैरव - बाळभैरव (टोळभैरव) मंदिर, श्रीक्षेत्र तुळजापूर, महाराष्ट्र.

                                 भारतात फक्त श्रीक्षेत्र 'काशी' आणि 'दक्षिण काशी' म्हणून लौकिक असणाऱ्या तुळजापुरातच ही 'भेंडोळी' खेळली जाते. ही 'भेंडोळी' म्हणजे एक ज्वालायात्रा आहे. एका लांब मोठ्या लाकडाला केळ आणि इतर झाडांच्या फांद्या बांधून त्याला मध्यभागी कापड गुंडाळून पेटविले जाते. आणि साहसी तरुण त्याच्या दोन्ही बाजू पालखीसारख्या आडव्या खांद्यावर घेऊन वेगाने मागेपुढे करत मंदिराभोवती आणि आवारात मिरवणूक काढतात. त्यावेळी कालभैरवासोबत भवानीचाही जयजयकार केला जातो. श्रीजगदंबेच्या क्षेत्रीचा हा 'कोतवाल' ज्वालायात्रेच्या रूपाने वर्षातून एकदा आपली दाहकता दाखवून दबदबा राखताना दिसतो.

श्री कालभैरवाची 'भेंडोळी', श्रीक्षेत्र तुळजापूर.(फोटो सौजन्य - पुजारी ओमकार मस्के)
 
श्री कालभैरवाची 'भेंडोळी', श्रीक्षेत्र तुळजापूर. (फोटो सौजन्य - पुजारी ओमकार मस्के)

                     तुळजापूर क्षेत्राला अनेक संतांचा संबंध येऊनही त्यांचे 'मठ' इथे दिसत नाहीत. त्यापैकी शाक्त, कापालिक, नाथ आणि दसनामी साधना संप्रदायाच्या पाऊलखुणा मात्र तुळजापुरात आज दिसतात. त्यातील जे काही पाच-सहा जुने मठ आहेत, त्या मठाधीपतींना श्री तुळजाभवानीच्या नित्य उपासनेतील पूर्वापार चालत आलेले काही अधिकार आहेत. गरीबनाथ मठ, भारतीबाबा मठ, हमरोजीबुवा मठ, वाकोजीबुवा मठ यांचा इथे विशेष उल्लेख करावा लागेल. पण दुर्लक्ष झाल्यामुळे ते आता क्षीण झालेले दिसतात.

                        त्यापैकी नाथपंथांच्या परंपरेतील भवानी मंदिराच्या उत्तरेला जवळच 'गरीबनाथ मठ' आहे. सध्या त्याला 'दशावतारांचा मठ' म्हणूनही ओळखतात. या मठातील 'प्रकाशनाथ' नावाच्या मठाधिपतींनी बेंगलोरच्या शिल्पकाराकडून दशावतारांच्या मुर्त्या घडवून त्यांची मठात स्थापना केली. मठाचे मूळ संस्थापक 'गरीबनाथ' आणि त्यांच्या शिष्यांच्या मठात समाध्या दिसतात.   

'गरीबनाथ मठ', श्रीक्षेत्र तुळजापूर जि. धाराशिव, महाराष्ट्र. Historical and Ancient places in Tuljapur, Dist. Dharashiv, Maharashtra.
मठपतींची 'समाधी', 'गरीबनाथ मठ', श्रीक्षेत्र तुळजापूर. महाराष्ट्र. 
 
'गरीबनाथ मठ', श्रीक्षेत्र तुळजापूर. महाराष्ट्र.

                           या मठातील मठाधिपतींना मठाबाहेर पडता येत नाही. तसेच भवानीचे नित्य दर्शनही घेता येत नाही. हा दंडक मठसंस्थापक गरीबनाथांच्या काळापासून पाळला जातो. या दंडकामागे एक मिथक सांगितले जाते की, गरीबनाथ एकदा काशीयात्रेस निघाले असता त्यांनी आपला संकल्प भवानीला सांगितला. तेव्हा भवानीने त्यांना यात्रेसाठी अनुज्ञा दिली नाही. 'सारी तीर्थे इथेच या गोमुखतीर्थातच उपस्थित आहेत' असे आग्रहपूर्वक सांगून जगदंबेने त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु गरीबनाथांनी देवीचा आदेश न पाळता काशीयात्रेला गेले. काशीहून परतताना मात्र त्यांच्या मागे 'गंगा' निघाली. गंगेचा भूमिगत खळखळाट त्यांनी तुळजापुरात पोहोचल्यावर मागे वळून पाहिला आणि गंगा थांबली. आणि तिथेच कल्लोळ तीर्थाच्या रूपात वाहू लागली. भरत खंडातील सर्व पवित्र जलांनी भवानीचे चरणसानिध्य अनुभवण्यासाठी येथे 'कल्लोळ' केला. म्हणून हे 'कल्लोळतीर्थ' नावाने प्रसिद्ध पावले. 

  

'कल्लोळ तीर्थ', श्री तुळजाभवानी मंदिर. 


                          या तीर्थात स्नान करताना गरीबनाथांच्या ओंजळीत लिंबू, नारळ आणि वेताची काठी या वस्तू आल्या. या तीनही वस्तू त्यांनी काशीत गंगेच्या पात्रात समर्पित केल्या होत्या. या अद्भुत अनुभवामुळे गरीबनाथांना देवीच्या उपदेशाचे रहस्य उमगले आणि त्यांनी देवीकडे क्षमायाचना केली. परंतु देवीने 'इथून पुढे तू आणि तुझ्या परंपरेतील मठपतींनी माझ्या दर्शनास येऊ नये. इतकेच नव्हे तर मठाचा उंबराही ओलांडू नये' असा शाप दिला. कोपलेल्या भवानीची गरीबनाथांनी करुणा भाकल्यानंतर जगदंबेने 'वर्षातून एकदाच अश्विनी अमावस्येच्या मध्यरात्री मठपतींनी मठाबाहेर पडावे आणि दर्शन घ्यावे' असा ऊ:शाप दिला.  

'कल्लोळ तीर्थ', श्री तुळजाभवानी मंदिर.श्रीक्षेत्र तुळजापूर जि. धाराशिव, महाराष्ट्र. Historical and Ancient places in Tuljapur, Dist. Dharashiv, Maharashtra.

                      आजतागायत भवानीची ही आज्ञा या मठातील मठपती फार कठोरपणे पाळतात. अश्विनी अमावस्येच्या मध्यरात्री मठपती भवानी मंदिरात येतात आणि त्या जगतमातेची यथासांग पूजा करून तिला महावस्त्र नेसवितात.


 'गरीबनाथ मठ', श्रीक्षेत्र तुळजापूर जि. धाराशिव, महाराष्ट्र.

                           या मठाला सातारा आणि करवीर या दोन्ही राज्यांचे छत्रपती तसेच पेशव्यांच्या काळापासून जमिनी इनाम दिल्या आहेत. मठपतींच्या वतीने त्या कसल्या जातात. भवानीच्या शाप, उ:षापाचा प्रभाव सध्याच्या मठपतींच्या आचार विचारांवर आहे. नाथपंथांचाही त्यांना रास्त अभिमान आहे. भवानीच्या निषेध आज्ञेचे कारण अगदी सहज स्वीकारून मठातले बंदिस्त जीवन ते शतकानूशतके व्यतीत करीत आहेत. नाथपंतांच्या उदयकाळापासून 'हिंगलाज' देवीची सुंदर सिंदूरचर्चित मूर्ती तांदळा रूपात या मठात विराजमान आहे.   

'श्री हिंगलाज माता', गरीबनाथ मठ, श्रीक्षेत्र तुळजापूर जि. धाराशिव, महाराष्ट्र. Historical and Ancient places in Tuljapur, Dist. Dharashiv, Maharashtra.

                            नेपाळचा राजा 'जयप्रकाश मल्ल' हा श्रीतुळजाभवानी बरोबर सारीपाट खेळत असे अशी कथा सांगितली जाते. हेच मिथक खुद्द तुळजापुरातही भवानीच्या मूळ ठाण्यातही ऐकण्यास मिळते. तुळजापुरातील अनेक मठांपैकी 'भारतीबुवांचा' मठ प्रसिद्ध आहे. या मठाची स्थापना 'रणछोडबुवा भारती' या सत्पुरुषाने केली. मठाच्या गादीवर आजवर बरेच महंत होऊन गेले. भवानी मंदिरापासून पश्चिमेकडे (सोलापूर - धाराशिव हायवेच्या डाव्या बाजूस लागूनच) एक किमी अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी आणि आता 'शिंदफळ' गावाच्या हद्दीत हा भारतीबुवांचा मठ आहे. मठाचे हे संस्थापक तपस्वी भवानीभक्त होते. साक्षात भवानी रोज रात्री त्यांच्याबरोबर सारीपाठ खेळत असे सांगितले जाते. सध्या या मठात भारतीबुवांची सुंदर समाधी आणि बाजूला भवानीचे देवालय बांधलेले आहे. मठात भवानीमाता आणि भारतीबुवा (रणछोडबुवा) यांचा 'सारीपाट', त्यांच्या बैठकीची 'आसणे' मूळ रूपात (Original) दिसतात.
रणछोडबुवा भारती आणि श्री तुळजाभवानीचा 'सारीपाट', भारतीबुवा मठ, तुळजापूर.

 

'भारतीबुवा मठ',  श्रीक्षेत्र तुळजापूर जि.धाराशिव, महाराष्ट्र. Historical and Ancient places in Tuljapur, Dist. Dharashiv, Maharashtra.

'भारतीबुवा मठ',  श्रीक्षेत्र तुळजापूर जि.धाराशिव, महाराष्ट्र. Historical and Ancient places in Tuljapur, Dist. Dharashiv, Maharashtra.

'भारतीबुवा मठ',  श्रीक्षेत्र तुळजापूर जि.धाराशिव, महाराष्ट्र. Historical and Ancient places in Tuljapur, Dist. Dharashiv, Maharashtra.

                              या भारतीबुवांच्या मठात त्याकाळची पुरातन 'बारव' (विहीर) दिसते. या विहिरीचा संबंध तुळजाभवानीला प्रतिवर्षी दसऱ्यात नवीन पलंग आणि पालखी पाठवणारे अहमदनगरचे 'जनकोजी देवकर' यांच्याशी येतो. 

                           जनकोजी देवकर हे नगर (अहमदनगर) जिल्ह्यातील 'भिंगारी' गावचे तेली समाजातील भवानीभक्त. अहमदनगरच्या निजामशाहीत सुलतानाने भिंगारीचे 'बुऱ्हाननगर' असे नामकरण केले. जनकोजींच्या दारी आलेल्या एका अनाथ मुलीचे त्यांनी संगोपन करून पोटच्या लेकीप्रमाणे वाढविले. वयात येतात या मुलीच्या रूपसौंदर्याची कीर्ती वासनांध बुऱ्हाणशहाच्या कानावर गेली. स्वतःच्या मुलीसमान असलेल्या या मुलीवर त्याने बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुलीने त्याला शाप दिला की, 'लवकरच तुला पापाचे फळ भोगावे लागेल. तुझे हे बुऱ्हाणनगरातील वैभव नष्ट होईल'. अल्पावधीतच तिचा शाप खरा ठरला. 

                           जनकोजी मात्र या कन्येच्या सानिध्यात श्रीमंत झाले. आपल्या कष्टातून मिळवलेली सर्व संपत्ती ते दानधर्मात खर्च करू लागले. एके दिवशी ते कन्येसह तुळजापूरक्षेत्री भवानी दर्शनाला निघाले. 'आष्टी' इथे आल्यावर या कन्यने आपले दैवी रूप प्रकट केले आणि अंतर्धान पावली. जनकोजी तुळजापुरात पोहोचले पण आतापर्यंत त्यांच्या घरी राहिलेल्या कन्येच्या रूपात भवानीच्या दर्शनासाठी ते व्याकुळ झाले. तुळजापुरातील भारतीबुवांच्या मठातील या विहिरीकाठावर उभा राहून त्यांनी भवानीला हाक दिली की, 'तू मला पुन्हा दर्शन दिले नाहीस तर मी या विहिरीत उडी घेऊन प्राणत्याग करेन'. त्यांची निर्वाणीची हाक ऐकून जगदंबा प्रकट झाली आणि सांगितले की 'मी पुन्हा परतणार नाही, पण दरवर्षी तू मला पालखी आणि पलंग तुळजापूरला पाठवत जा'. जनकोजींनी पुढे हा क्रम निष्ठेने पाळला. एकदा तुळजापुरला येताना वार्धक्यामुळे जनकोजींचे 'आष्टी'जवळ निधन झाले. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचे शव तुळजापुरात आणून भवानीच्या क्षेत्रातच अंत्यसंस्कार करण्यात आला. सध्या तुळजापुरातील शुक्रवार पेठेत जनकोजींची समाधी आहे. आजही जनकोजींचे वंशज नगरहून पालखी आणि पलंग श्रद्धेने पाठवितात. आणि ज्या विहिरीवर (बारव) जनकोजी उभा राहून कन्येच्या प्रेमापोटी भवानीला आर्त साद घातली, ती विहीर भारतीबुवांच्या मठात आजही अस्तित्वात आहे. इतकेच की सध्या तिचे महत्त्व विसरलेले किंवा पूर्ण दुर्लक्षित झाले आहे.   

'बारव' (विहीर) - भारतीबुवा मठ. श्रीक्षेत्र तुळजापूर जि.धाराशिव, महाराष्ट्र. Historical and Ancient places in Tuljapur, Dist. Dharashiv, Maharashtra.

'भारतीबुवा मठ',  श्रीक्षेत्र तुळजापूर जि.धाराशिव, महाराष्ट्र. Historical and Ancient places in Tuljapur, Dist. Dharashiv, Maharashtra.

                              या मठांव्यतिरिक्त भवानी मंदिराच्या नैऋत्येकडे 'वाकोजीबुवांचा' जुना मठ आहे. भवानी मंदिराची चावी या मठाच्या अधिपतींकडे असते. मठाची गादी ब्रह्मचारी पुरुषाकडे आहे. भवानी मंदिरातील दिवाबत्ती आणि मंदिर रोषणाईची व्यवस्था तसेच सकाळची चरणतीर्थ पूजा व रात्री प्रक्षालनपूजा ही नित्य उपासनेतील कामे वाकोजीबुवांच्या मठाकडे आहेत. या सेवेसाठी मठास सरकारकडून ठराविक रक्कम मिळते. या मठात भवानीची सुंदर मूर्ती आहे.  

श्री तुळजाभवानी मंदिर. Historical and Ancient places in Tuljapur.

                    'हमरोजीबुवां'च्या मठाकडे देवीचा जमादारखाना सांभाळण्याचे अत्यंत जबाबदारीचे आणि जोखमीचे काम आहे. देवीच्या जमादारखान्यात तिच्या रत्नजडित सुवर्णाअलंकारांचा समावेश आहे. त्यामुळे या मठाचे प्रमुख देवीस अलंकार चढवताना आणि ते विशिष्ट वेळी उतरवताना जातीने उभे राहतात. 

                       या मठांशिवाय गावाच्या उत्तरेला 'अरणबुवांचा' मठ आणि गावाच्या दक्षिण सीमेवर 'सोमवार गिरजीं'चा मठ आहे.

                   सर्व तीर्थक्षेत्रात असतात तशी तुळजापुरातही बरीच 'तीर्थे' (पवित्र जळे) आहेत काही कुंडांच्या स्वरूपात, काही विहिरी तर काही वाहती आहेत. गावात बिडकर तलाव, कालभैरव तलाव, रामदरा तलाव तसेच अहिल्याबाईंची विहीर, कोटाची विहीर, पिराची विहीर, भगवतीबाईंची विहीर अशा बऱ्याच विहीरी आहेत. 

                      भगवतीबाई ही एक कर्तबगार स्त्री, कदम पाटील भोपे यांच्या घराण्यातील. 'भोपे' म्हणजे भवानीदेवीचे 'पुजारीपण' सांभाळणारे. कोल्हापुरचे भोपेराव घराणे हे भगवतीबाईंचे मूळ घराणे. आम्ही चौकशी करून शोध घेतला तेव्हा 'श्रीछत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्ट कोल्हापूर' यांच्या अखत्यारीतील या जागेत छ. राजाराम महाराजांच्या (महाराणी ताराबाईंचे नातू) कालखंडात बांधलेला इथे वाडा आहे. सध्या त्याची पडझड झाली आहे. वाड्याची दगडी कमान जी शेवटची आठवण जागेवर शिल्लक दिसते, तीही शेवटची घटका मोजताना दिसते. या वाड्याचे दगडही स्थानिकांनी जाग्यावर ठेवलेले दिसत नाहीत. वाड्यात एका दगडी चौथर्‍यावर त्यावेळची श्रीभवानीची अतिसुंदर मूर्ती आहे.  

'श्रीछत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्ट कोल्हापूर', श्रीक्षेत्र तुळजापूर.

छ. राजाराम महाराज कालखंडातील वाडा, श्रीक्षेत्र तुळजापूर. जि.धाराशिव, महाराष्ट्र.

वाड्यातील 'श्री भवानी मंदिर'. श्रीक्षेत्र तुळजापूर, महाराष्ट्र.

                        कोल्हापूरच्या महाराणी ताराबाईंचे नातू 'रामराजे' हे भाऊबंदकीच्या कारस्थानात बळी पडू नये म्हणून ताराबाईंनी त्यांना जन्मापासूनच गुप्तपणे सुरक्षित ठिकाणी ठेवले. ते प्रथम विशाळगडावर अमात्यपंतांच्या नजरेखाली आणि नंतर भगवतीबाईंच्या या घरी तुळजापुरात 'भोप्यांचे' बाळ म्हणूनच वाढले. हेच अल्पवयीन रामराजे पुढे शाहू छत्रपतींच्या निर्णयानंतर साताऱ्याच्या गादीवर नवे छत्रपती म्हणून आरुढ झाले. पुढे करवीरकर छत्रपतींनी कृतज्ञतापूर्वक भगवतीबाईंच्या  वंशजांना कोल्हापुरात आणून मोठे केले. आमच्या भेटी दरम्यान तुळजापूर गावातीलच एक कुटुंब त्यांच्या घराची दुरुस्ती सुरू असल्याने पडलेल्या या वाड्यात राहायला आलेले दिसले.

छ. राजाराम महाराज कालखंडातील वाडा, श्रीक्षेत्र तुळजापूर. जि.धाराशिव, महाराष्ट्र. Historical and Ancient places in Tuljapur, Dist. Dharashiv, Maharashtra.

                         वाड्याच्या उजवीकडे कोल्हापूर संस्थानाच्या या कर्तबगार भगवतीबाईंनी तुळजापुरात येणाऱ्या भाविकांची तहान भागविण्यासाठी सुंदर विहीर बांधली. या विहिरीच्या काठावर देवी भगवतीचे पुरातन छोटे मंदिर दिसते. मंदिरात दिवाबत्ती केलेली दिसते. पुजाऱ्यांच्या (भोपे) घरांनी गराडा घातलेल्या या विहिरीत उजवा वळसा मारून उतरता येते. घडीव पायऱ्यांवरून वळसा मारताना त्यावेळीची सुघड दगडी कमान, कमानीच्या दोन्ही बाजूस देवड्या आणि उजव्या देवडीत श्री गणेशाची भान हरपणारी सुंदर मूर्ती दिसते. विहिरीच्या काठावर रेखीव 'गोमूख' आणि त्यावेळची 'रहाट' व्यवस्थाही दिसते. विहीर सध्या कचरा, गाळाने भरली आहे आणि त्यांच्या जोडीला दुर्गंधी आहेच. ही पुरातन विहीर आणि वाडा गावाच्या 'कमानी वेशी'पासून भवानी मंदिराकडे जाणाऱ्या 'महाद्वार' रस्त्याच्या उजवीकडे आहेत.

'भगवती विहिरी'त समोर कमानीतून उतरणाऱ्या पायऱ्या. श्रीक्षेत्र तुळजापूर. जि.धाराशिव, महाराष्ट्र. Historical and Ancient places in Tuljapur, Dist. Dharashiv, Maharashtra.

भगवती विहिरीच्या कमानीतील 'श्री गणेश'. श्रीक्षेत्र तुळजापूर. जि.धाराशिव, महाराष्ट्र. Historical and Ancient places in Tuljapur, Dist. Dharashiv, Maharashtra.

'भगवती विहिरी'त उतरणाऱ्या पायऱ्या. श्रीक्षेत्र तुळजापूर. जि.धाराशिव, महाराष्ट्र. Historical and Ancient places in Tuljapur, Dist. Dharashiv, Maharashtra.

                        तुळजापूर गावाच्या दक्षिणेस बालाघाट डोंगराच्या कड्यावर 'पापनाशी तीर्थ' आहे. अहिल्याची वंचना करून, कपटाने तिचे शील हरण करणाऱ्या इंद्राची गौतम ऋषींच्या शापातून मुक्तता झाली ती पापनाशी तीर्थात स्नान केल्यामुळे. 

                       'मातंगी कुंड' हे मातंगी देवीशी संबंधित आहे. पूर्वास्पृश्य समाजातील भाविकांप्रमाणे सवर्ण भाविकही नवरात्रात या तीर्थात स्नान करतात.

                      आकाराने मोठे असलेले 'मंकावती तीर्थ' हे भवानी मंदिराच्या पूर्वेकडे आहे. 'विष्णूतीर्थ' या नावाने स्थलपुराणात याचा उल्लेख आहे. 'महिकावती' किंवा 'कोट्टमहिका' या मातृदेवतेशी त्याचा संबंध येतो. या तीर्थाला तीन बाजूंनी प्रवेशद्वारे असून या तीर्थात भवानी आपल्या ६४ योगिनींच्या परिवारासह जलविहार करते अशी श्रद्धा आहे. आम्ही भेट दिली त्यावेळी हे तीर्थ बंद ठेवून त्याची अंतर्गत दुरुस्ती सुरू होती.

                           'नागझरी तीर्थ' हे भवानी मंदिराच्या उत्तरेस कालभैरवाच्या वाटेवर दक्षिण बाजूस डोंगरदरीत आहे. अहिरावणाने वासूकीचे राज्य हिरावून घेतल्यानंतर त्या नागराजाने राज्याच्या पुनर्प्राप्तीसाठी जेथे तप केले आणि त्याच्या तपाचे फळ त्याला मिळाले ते हे स्थान. या तीर्थाचीही महती स्थलपुराणात असल्यामुळे मनोकामना पूर्तीसाठी भाविक या तीर्थात स्नान करतात. नारायण नागबळी असे विधीही इथे होतात.

                      यानंतर आम्ही अहिल्यादेवींनी बांधलेल्या विहिरीचा शोध घेतला. मल्हारराव होळकरांची सून, पुण्यश्लोक माता अहिल्याबाईंनी मल्हाररावांच्या त्यावेळच्या पंधरा सोळा कोटी रुपयांच्या शिल्लकीतून प्रचंड 'धर्म' केला. हे द्रव्य केवळ ब्राह्मणभोजन आणि साधुसंत फकीरांना न वाटता, त्यांनी भारतवर्षात  हिंदू धर्मांच्या पवित्र ठिकाणी मोठमोठ्या वास्तू उभारल्या. गरीब यात्रेकरूंसाठी अन्नपाण्याची सोय लावून दिली. काशी, प्रयाग, गया, हरिद्वार, आयोध्या, रामेश्वर इत्यादी ठिकाणी त्यांनी बांधलेले घाट व मंदिरे प्रसिद्ध आहेतच. तुळजापुरातही 'कमानी वेशी'वर डाव्या बाजूला अहिल्याबाईंनी बांधलेली ही मोठी विहीर त्यांच्या विवेकी धर्मबुद्धीचा आणि उदारतेचा पुरावा देते. 

'अहिल्यादेवींची विहीर'. श्रीक्षेत्र तुळजापूर. जि.धाराशिव, महाराष्ट्र.

                              चौकशी करत या ऐतिहासिक विहिरीजवळ पोहोचलो आणि तीची अवस्था बघून डोळ्यांवर विश्वास बसला नाही. ही पुरातन विहीर गावच्या मुख्य 'कमानी वेशी'वर असून विहिरीच्या तीनही बाजूंनी स्थानिक इमारतींनी गराडा घातला आहे. विहिरीची रस्त्याकडील चौथी बाजू लोखंडी जाळीदार दरवाजाने कुलूपबंद आहे. या दरवाजाच्या तोंडावर अतिक्रमण केलेली आडवी पानाची टपरी'ही दिसते. दरवाजातून आत डोकावून पाहिल्यास विहिरीत प्रचंड वाढलेल्या झुडपातून विहिरीच्या कातळ भिंती, सुंदर दगडी कमान, घडीव पायऱ्या दिसतात. गाळ आणि विहिरीत टाकलेल्या कचऱ्यातून त्या शोधाव्या लागतात. अहिल्याबाईंच्या आगळ्या भक्तीचा आईभवानीलाही अभिमान वाटावा असा त्यांनी दिलेला वारसा आज सांभाळताही येईना याची खंत वाटली.  

'अहिल्यादेवींची विहीर'. श्रीक्षेत्र तुळजापूर. जि.धाराशिव, महाराष्ट्र.  Historical and Ancient places in Tuljapur, Dist. Dharashiv, Maharashtra.

'अहिल्यादेवींची विहीर'. श्रीक्षेत्र तुळजापूर. जि.धाराशिव, महाराष्ट्र.

                     इथल्या विहिरी, तलावांची आणि तीर्थप्रतिष्ठा लाभलेल्या कुंडांची अवस्था मुळात स्वच्छ, सुंदर असायला हवी. पण भवानीमंदिरातील कल्लोळतीर्थ, गोमुखतीर्थ आणि मंकावती तीर्थाव्यतिरिक्त इतर कुंडांकडे  स्थानिक नगरविकास तसेच पुरातत्व खात्याने अगदीच दुर्लक्ष केलेले दिसते. या व्यतिरिक्त काही ऐतिहासिक वास्तू तसेच पुरातन परिवार देवतांच्या जागा, ज्या भवानीशी संबंधित आहेत आता त्यांचे महत्त्व लुप्त होऊन नाहीशा होत चालल्या आहेत.. 

                                                                                                             || श्रीकृष्णार्पणमस्तू ||

                         (श्री तुळजाभवानी मंदिर, भवानीचा प्राचीन इतिहास आणि भवानीचा गोंधळ याबद्दल सविस्तर माहिती sahyadri300.blogspot.com/2025/12/shri-tuljabhavani-tuljapur-dist.html या लिंकवर सविस्तर दिली आहे.)

येथे - जयवंत जाधव

'किल्ले कर्नाळा' - ता. पनवेल जि. रायगड, महाराष्ट्र. 'Karnala Fort', Panvel, Dist. Raigad, Maharashtra.

                       रोजच्या धावपळीतून थोडी मोकळीक मिळाली की, दूर निवांत निसर्गाच्या सानिध्यात जाण्यास सर्वजण उत्सुक असतात. पण सर्वांनाच ह...