मराठवाड्याच्या भटकंतीत 'परांडा' किल्ल्यानंतर संत गोरोबा कुंभारांच्या 'तेर' (ढोकी) गावी गेलो. जाण्याचा उद्देश फक्त वारकरी संप्रदायाचे संत गोरोबा काकांच घर आणि त्यांनी वय वर्षे ४९ व्या वर्षी घेतलेल्या समाधी मंदिराचं दर्शन घेणं इतकाच होता.
आजोबा आणि चुलते वारकरी संप्रदायाचे असल्यानं तसेच वडीलही अधून मधून वारी करत असल्यानं भागवत धर्म आणि 'तेर' ला जाण्याबद्दल मनात एक अनामिक ओढ होतीच. कोल्हापूर जिल्ह्यातील आमच्या मूळ गावातून त्यावेळच्या दळणवळणांच्या साधनांमुळं पंढरपूर, देहू-आळंदी त्यांना दूर असायची. त्यानंतर पुढे गोरोबा काकांचं 'तेर' तर त्यांना दूर कर्मकठीणच होतं. इथपर्यंत आलोच आहे तर आपण तरी जाऊ, बघू, इतकाच उद्देश होता.
मागे औरंगाबादच्या भटकंतीत संत एकनाथांच्या पैठणला भेट झालीच होती. या वेळचा योग हे कदाचित पूर्वसंचित असावं..
उस्मानाबाद पासून 'तेर' उत्तर पूर्वेला २८ किलोमीटर आहे. स्वतःचं वाहन असल्यानं बार्शीहून पुढे ५७ किमीचं 'तेर' तासाभरातच गाठलं. आणि या प्राचीन गावचे धागेदोरे उलगडत गेले तसं अचंबित झालो. विचारपूस करत एस टी स्टँडच्या पुढे गावाबाहेर तेरणा नदीचा पूल ओलांडला की नदीकाठावरच्या घाटावर डाव्या हाताला लाल रंगातील 'श्री कालेश्वर' महादेवाचं पुरातन मंदिर लक्ष वेधून घेतं. त्याच्याच बाजूला गोरोबा काकांचं समाधी मंदिर आहे.
 |
प्राचीन श्री कालेश्वर महादेव मंदिर ( Kaleshwar Temple) |
 |
गोरोबा काकांचं समाधी मंदिर (Goroba Temple) |
 |
तेरणा नदी (Terna River) |
७ व्या शतकातील चालुक्य घराण्यातील हे श्री कालेश्वर मंदिर मोठं सुबक असून, अंतराळविरहित आहे. गर्भगृहाचं छप्पर चौरस असून वर निमुळतं होत गेलं आहे. पुढे सभामंडप आहे. मंदिराच्या बाहेरील आधारभिंती मध्ययुगीन काळात बांधल्या असाव्यात. सध्या भिंतींना गिलावा केल्यानं मुळ भिंतीच्या आराखड्याचा अंदाज येत नाही. शिखर द्राविडी पद्धतीचं असून शिखरामध्येही छोटं मंदिर आहे. त्यात एक यज्ञकुंड असून, हे यज्ञकुंड म्हणजेच सितामाईची जागा होती असं समजलं जातं.
 |
गोरोबा काकांचं मंदिर(मागील बाजू) |
 |
प्राचीन श्री कालेश्वर महादेव मंदिर |
काही इतिहास संशोधकांच्या मते महेश्वराचे परमभक्त कालचुरी राजवटीतील हे मंदिर असावं. पुराणकथेनुसार मात्र दुर्वास ऋषी नेहमी पूजा करत असलेलं हे कालेश्वराचं मंदिर विश्वकर्म्यानं बांधलं आहे.
 |
गोरोबा काका मुखवटा (समाधी मंदिर) |
 |
गोरोबा काकांचं समाधी मंदिर (आतील बाजू) |
गोरोबा काकांच्या समाधी मंदिरामागेच पुरातन आणि सुबक नक्षीचं निलकंटेश्वर महादेव मंदिर आहे.पश्चिमेकडं शिवलिंगाचं तोंड असलेलं हे वैशिठ्यपुर्ण मंदिर आहे.
 |
निलकंठेश्वर मंदिर (Nilkantheshwar Temple) |
त्यानंतर आम्हाला उत्कंठा असलेलं काकांचं घर शोधत गावात गेलो. तिथं मात्र भ्रमनिरास झाला. नवीन सिमेंटचं बांधकाम करून, घराला पुराण आभास देण्याचं काम सध्या पुरातत्व विभागानं चालू केलं आहे. घरात छप्पर तोलून धरण्यासाठी लाकडी खांब बसवले असून, त्यांना ऐतिहासिक स्वरूप आणण्याचा प्रयत्न केला आहे. आत पुढे डाव्या कोपऱ्यात चौथऱ्यावर विठ्ठल मूर्ती उभी आहे. जिथं हा चौथरा आहे, तिथंच काकांचा मडकी बनवण्यासाठी चिखलाचा गारा असायचा असं तिथल्या एका आजीबाईनं माहिती दिली.
 |
घरातील चौथरा |
 |
गोरोबा काकांचं घर |
कालपरत्वे ७०० वर्षांपूर्वीचं मातीचं घर टिकाव धरून राहणं अशक्यच आहे, पण गोरोबा काकांच्या नांदत्या घराची जागा बघून मात्र समाधान झालं.
चैत्र वद्य एकादशी ते आमावस्या कालावधीत तिथं मोठा उत्सव भरतो. आजूबाजूच्या पंचक्रोशीतून वारकरी सांप्रदायाच्या दिंड्या, पालख्या काकांच्या भेटीस येतात. भजन कीर्तन आणि पारायणं होतात. बाराव्या शतकातील गोरोबा काकांचे समकालीन व त्यानंतरही संतश्रेष्ठांचा येथे मेळा भरायचा. त्याकाळीही भागवत धर्माचं 'तगर' म्हणजेच सध्याचं 'तेर' एक प्रमुख केंद्र होतं.
'तेर' गावच्या मध्यवर्ती वस्तीत एक विष्णुचं मंदिर असून, त्याचा आकार गजपृष्ठासारखा (हत्तीची पाठ) आहे. पहिल्या शतकातील सध्या पाकिस्तानात असलेल्या 'तक्षीला' आणि 'सिरकप' शहराच्या स्थापत्य शास्त्राची प्रेरणा घेऊन तिसऱ्या शतकात ही वास्तू बांधली असावी.
 |
त्रिविक्रम मंदिर (समोरून) Trivikram Temple |
 |
त्रिविक्रम मंदिर (मागील बाजू) Trivikram Vishnu Temple |
सातवाहन काळातील हे मंदिर असून, आधी त्या जागेवर बौद्ध चैत्य असावे. पुढे सुमारे तीनशे वर्षानंतर म्हणजे सहाव्या शतकातील चालुक्य काळात बौद्ध धर्माचा पगडा ओसरल्यानंतर त्यावर हलक्या व मजबूत विटांचं छप्पर घालून आत त्रिविक्रम अवतारातील (बळीला पाताळात दाबताना) विष्णूची मूर्ती स्थापली. या केलेल्या बदलामूळंच मंदिराचा आकार बौद्ध चैत्यसारखा दिसतो.
आत मंदिरात काळ्या पाषणातील श्री विष्णूंची भव्य रेखीव सुबक मूर्ती आहे. श्री विष्णूंच्या पायाखाली बळी आहे. बाजूलाच बळीची पत्नी असून शुक्राचार्यही आहे. महाराष्ट्रातील हे एकमेव वैशिष्ठ्यपूर्ण अतिशय पुरातन मंदिर आज इथं अस्तित्वात आहे. 'प्राचीन त्रिविक्रम विष्णू मंदिर' म्हणून त्याची ख्याती आहे.
 |
त्रिविक्रम विष्णु मूर्ती |
मंदिराच्या गर्भगृहासमोर पुर्णतः हलक्या विटांनी बांधलेला आणि मजबूत लाकडी खांबांनी आधार दिलेला, अंदाजे साडेतीन मीटर उंचीचा सभामंडप आहे. इथल्या लाकडी तुळया आणि खांबांचं काम बघण्यासारखं आहे. मंडपात गर्भगृहासमोरच यज्ञ वेदी (धुमी) असून जमीन ओबडधोबड पण सारवलेली आहे.
 |
मंडप |
या मंडपात संत नामदेवांनी कीर्तन केल्याचा उल्लेख 'तेर' च्या इतिहासात आढळतो.
या मंदिराच्या प्राकारात प्रवेश करताच समोर पुरातत्व खात्याचा या मंदिराबद्दल माहितीचा फलक दिसतो. त्यावरील लेख ऊन पावसामुळं पूर्ण मिटला आहे. या प्राचीन अमूल्य आणि दुर्मिळ ठेव्याचं रक्षण सध्या दैवावर हवाला ठेवून होत आहे.
मंदिरासमोर मंडपात गरुड मूर्ती हात जोडलेल्या मुद्रेत असून बाजूलाच उजवीकडं महदेवाचं छोटं पुरातन देवूळ आहे. त्यात शिवलिंगामागेच पार्वती, गणेश आणि नागमूर्ती आहेत.
 |
गरुड मंडप |
 |
महादेव देवुळ |

हलक्या आणि टिकाऊ विटांचं तंत्र त्याकाळी विकसित असावं. अशाच विटांचा एक बौद्धकालीन स्तूप 'तेर' एस टी स्टँडच्या समोरच केलेल्या उत्खननात नजीकच्या काळात सापडला आहे. मातीत मोठ्या प्रमाणात तूस मिसळून त्याची विट उच्च तापमानाला भाजल्यास आतील तूस जळून जातं. आणि सच्छिद्र पोकळ्या तयार झालेली विट वजनानं खूप हलकी व मजबूत होते. या विटांची घनता पाण्यापेक्षा कमी असल्यानं त्या पाण्यावर सहज तरंगतात.
अशी पाण्यावर तरंगणारी वीट तिथल्या कै. रामलिंगप्पा लामतुरे वस्तुसंग्रहालयात असून, अशाच विटेचा एक तुकडा गोरोबा काकांच्या मंदिरासमोर पाण्यावर तरंगताना दिसतो.
महाराष्ट्रात मराठवाडा हे १५२४ पासून भूकंप प्रवण केंद्र असल्याच्या नोंदी आहेतच. प्राचीनकाळी जीवितहानी टाळण्यासाठी अशा हलक्या विटांची घरं आणि मंदिरं बांधण्याचं तंत्र तिथं विकसित झालं असावं.
उस्मानाबाद पासून २८ किलोमीटरवर असलेल्या 'तेर'चा पुराणात 'सत्यपूरी असा उल्लेख आढळतो. काही ठिकाणी 'तगर' नगर असा उल्लेख आहे.
इथं असलेल्या पुरातन मंदिरांची निर्मिती दुसऱ्या ते सातव्या शतकातील आढळते. उत्खननात सापडलेले बौद्धकालीन स्तूप, शिलाहार काळातली नाणी, त्याचप्रमाणे सातवाहन कालीन देवतेच्या मुर्त्या तसेच ग्रीक व रोमची नाणीही सापडली आहेत.यावरून 'तेर' हे प्राचीन काळी व्यापार, संस्कृती आणि धर्म प्रचाराच्या प्रमुख केंद्रापैकी एक असल्याचे पुरावे समोर आले आहेत. तसेच अनेक प्राचीन हस्तिदंती वस्तू, कंगवे, मातीच्या भांड्यांचे तुकडे, मणी, गळ्यातील हार, बाहुल्या, शंख शिंपले,
जुन्या मोठाल्या विटा उत्खननात सापडल्या आहेत.
 |
कै. रामलिंगप्पा लामतूरे |

या सर्व
वस्तू तिथल्या कै. रामलिंगप्पा लामतुरे वस्तू संग्रहालयात ठेवल्या आहेत. कै. रामलिंगाप्पांनी त्यांच्या हयातीत प्रतिकूल परिस्थितीतही अथक प्रयत्नांनी जमवलेल्या या
जवळ जवळ २५ हजार
वस्तु १९७२ मध्ये
शासनाच्या हवाली केल्या.
रोम आणि ग्रीकचे व्यापारी किंमती माल दक्षिणेकडून प्राचीन 'तगर' आणि 'पैठण' ला आणून नंतर तो बैलगाडीत भरून गुजरातमध्ये सध्याच्या भरुच (भडोच)ला पाठवत. असा उल्लेख एक ग्रीक प्रवाशानं 'पेरिप्लेस ऑफ द एरिथ्रीएन सी' या ग्रंथात इ. स. ५० ते १३० च्या काळात केला आहे. दुसऱ्या शतकात 'टोलेमी'ने केलेल्या प्रवास वर्णनात 'तेर' चा उल्लेख आढळतो. सातवाहन काळात या नगरानं सुवर्णकाळ अनुभवला असून, 'तेर' त्या काळी दक्षिणेची राजधानी होती.
'तेर' गावातच श्री उत्तरेश्वराचं इ. स. ५५० च्या सुमारास फक्त हलक्या आणि कलात्मक विटांनी बांधलेलं महादेव मंदिर आहे. पण वेळेअभावी ते पाहता आलं नाही.
आधी उल्लेख केल्याप्रमाणे तिथं आमचं जाणं केवळ गोरोबा काका इतकंच होतं, पण इथून निघताना मात्र बरंच काही घेऊन निघालो..
|| श्री कृष्णार्पणमस्तू ||
येथे - जयवंत जाधव